लहान मुलाला शिकवण्यासाठी शिक्षक हातात पाटी घेतात. तसे संत स्वतः कृती करून लोकांना शिकवतात. आई जाणूनबुजून बालकाबरोबर हळूहळू चालते. खोल पाण्यात बुडू नये म्हणून जशी नाव उपयोगी पडते तसे संत आहेत असं तुकाराम महाराज सांगतात. शिक्षकाला लिहिता वाचता येत असतं. पण लहान बालकाला पाटी कशी धरावी, पेन्सील कशी धरावी, अक्षर कसं काढावं, ते शिकवण्यासाठी ते स्वतः तसं करून दाखवतात. हातात पाटी पेन्सिल घेतात. लहान मुलाला त्याचा हात धरून अक्षर गिरवतात. त्याच्या हाताला चांगलं वळण लागावं म्हणून मदत करतात. तसेच संत असतात. ते स्वतः अशी कृती करतात, स्वतः असे वागतात की त्यावरून लोकांना तसं वागण्याची प्रेरणा मिळावी. लोकांनी त्यांचं अनुकरण करावं. आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी तुकाराम महाराज आईचं उदाहरण देतात. लहान बालक हळूहळू एक एक पाऊल टाकू लागतं. त्याला तोल सांभाळता येत नाही. दोन पावलं चाललं की बाळ पडतं. पुन्हा उठतं. चालायचा प्रयत्न करतं. बाळ दुबळं असतं. ते चालायला नव्यानेच शिकत असतं. आई मोठी असते, ती धावू , पळू शकते. पण तरीही आपल्या बाळाची क्षमता ओळखून ती त्याच्या गतीने चालते. त्याची सोबत करते. त्याला आश्वस्त करते. आपण त्याच्याबरोबर असल्याचा विश्वास देते. त्याला चालण्यासाठी प्रोत्साहन देते. त्याला पडू देत नाही. पडू लागताच चटकन आधार देते. हळूहळू बाळ सरावतं. न पडता चालू लागतं. पळू लागतं. तसंच संतांचं असतं. ते समाजाला बरोबर घेऊन चालण्यासाठी, समजून उमजून मोठेपणा बाजूला ठेवतात. समाजाला शिकवण्यासाठी, शहाणं करण्यासाठी शिक्षकासारखं, मातेसारखं वागतात. माता, शिक्षक आणि संत यातील साधर्म्यता जगदगुरू तुकाराम महाराज फार सुंदर शब्दात वर्णन करतात. तसंच, नाव जशी खोल पाण्यात आधार देते, बुडू देत नाही, तसे संत आपल्याला हा भवसागर तरुण जाण्यासाठी मदत करतात असं तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. तुकाराम महाराज ज्यांना संत म्हणतात ते क्रियाशील संत आहेत. नुसते बोलभांड नाहीत. बोलायचं एक आणि करायचं वेगळं असं ते करत नाहीत, तर आपल्या क्रूतीतून ते उदाहरण देऊन शिकवतात. जसे बोलतात तसेच ते वागतात. - उल्हास पाटील *गाथा परिवार* ९९७५६४१६७७
गाथा परिवार
सत्य असत्याशी मन केले! ग्वाही मानियेले नाही बहुमता !!

जय हरि