गाथा परिवार

सत्य असत्याशी मन केले! ग्वाही मानियेले नाही बहुमता !!

photo

५०. अभंग क्र. ११४
तीर्थीं धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ।।१।।मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ।।२।। तीर्थीं भाव फळे । येथें अनाड तें वळे ।।३।। तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ।।४।।


तीर्थक्षेत्री फक्त धोंडा आणि पाणी आहे. देव सज्जन माणसात आहे. संतांचा सहवास मिळाला तर त्यांना आपलं सर्वस्व समर्पित करावं. जर मनी भाव असेल तरच तीर्थी गेल्यावर फळ मिळतं. पण संताजवळ जो जाईल, तो अडाणी असो, त्याचा देवावर भाव असो अगर नसो, त्याला फायदाच होतो. तुकाराम महाराज म्हणतात, माणसाच्या मनातलं पाप नष्ट झालं म्हणजे त्याच्या मागचा तापही नष्ट होतो. 
		        *पोटभरु पुजाऱ्यांनी अनेक पोथ्या-पुराणांतून विविध तीर्थस्थानांचं क्षेत्र महात्म्य लिहून ठेवलं आणि पुराणिकांनी ते घरोघर पसरवलं. अडाणी जनता त्याला फशी पडली. तीर्थाला जायचं, तिथला पुजारी सांगेल तसे अभिषेक, अनुष्ठान करायचे, दान-दक्षिणा द्यायची आणि स्वत:ला लुटून घ्यायचं. पदरी पुण्य गाठल्याचं खोटं समाधान मिळवायचं. गावात कोणी उपाशी मरत असेल तरी त्याकडे लक्ष द्यायचं नाही, तहानलेल्याला पाणी द्यायचं नाही. गरजवंताला मदत करायची नाही. कोणाला आधार द्यायचा नाही. इकडे भले कोणी अन्नावीण उपाशी मरत असला तरी त्याला काही द्यायचं नाही, पण तीर्थस्थानी जाऊन दगडाच्या मूर्तीला दह्या-दुधाने, तेला-तुपाने आंघोळ घालायची. गावात भले कोणाला अंग झाकायला साधे जरडभरड वस्र नसो, पण दगडाच्या देवाला मात्र भरजरी वस्रं नेसवायची. गावात एखाद्याच्या अंगावर फुटका मणी नसेल पण देवाला सोन्याचा मुकुट घालायचा. इतकं करूनही अडचण आली तर तो देव मदतीला धावून येत नाही. केदारनाथ प्रकोप झाला, हजारो माणसं वाहून गेली, पण कोणालाही वाचवायला कोणताही देव आला नाही. कोरोना आला. जगभरात लाखो माणसं मरण पावली, मरत आहेत. पण कोरोनापासून लोकांना वाचवायला ना ख्रिश्चनांचा प्रभू आला, ना मुस्लिमांचा अल्ला आला ना हिंदूंच्या तेहेतीस कोटी देवांपैकी कोणी देव वा देवी प्रकटले. पोलिस, लष्करी जवान, नर्सेस, डॉक्टर, सरकारी अधिकारी, समाजसेवक, सामान्य सह्रदय स्त्री-पुरुष, नेहेमीच लोकांच्या शिव्याशापांचे धनी होणारे नेते दिवसरात्र लोकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी झटत आहेत. माणसंच माणसांच्या कामाला येतात असं महापुरात दिसलं, तेच चक्रीवादळासारख्या संकटात दिसलं! अशा बिकट काळात आपल्या माणसात असावं म्हणून शेकडो मैल मुलाबाळांसह रणरणत्या उन्हात आपल्या गावाकडे पायी जाणाऱ्या, तहान भुकेने व्याकुळ झालेल्या, पावलं विदीर्ण झालेल्या भुक्याकंगालांना दोन घास अन्न, घोटभर पाणी द्यायला माणसंच पुढे आलीत. कोणताही देव पुढे आला नाही. उलट मंदीर, मशीदी, चर्चेस सर्व बंद करण्यात आले. धर्मस्थळांना तोटा होत असल्यामुळे काही धर्मस्थळांच्या व्यवस्थापकांनी तिथे काम करणाऱ्या नोकराचाकरांचे पगार कापले, तर काहींनी माणसंच कामावरुन कमी केली. हा आपल्या सर्वांचा आँखों देखा हाल आहे ! जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या, "तीर्थी धोंडा पाणी" या उक्तीचा इतका जिताजागता परिचय इतक्या व्यापक प्रमाणात, इतक्या स्पष्टपणे आपल्या पिढीला येत आहे. तरीही जित्याजागत्या माणसांकडे दुर्लक्ष करून, कधीच न पावणाऱ्या देवामागे जी माणसं पळतात, त्यांना जगद्गुरू तुकाराम महाराज चारशे वर्षांपूर्वीपासून स्पष्ट शब्दात सांगत आहेत, *‘तीर्थी फक्त धोंडा आणि पाणी आहे. देव जर भेटायचाच असेल तर तो सज्जन माणसाच्या रूपातच भेटेल.* असे *सज्जन, संत भेटले तर त्यांची अंग झाडून सेवा करा.’* अडाणी लोकांना तीर्थी जाऊन समाधान मिळतं. पण ते खोटं असतं. *आपलं खरं तीर्थ म्हणजे आपले आईबाप होय. तेच आपल्याला या जगात आणतात, पाळतात, पोसतात, मोठं करतात. तेच खरे देव आहेत. रंजल्या-गांजलेल्यांची जे सेवा करतात ते देव असतात, आपल्यासाठी आपलं मोठेपण विसरुन जे हाती पाटीपेन्सील घेताता आणि आपल्याला ज्ञान देतात, ते शिक्षक देव आहेत, समाजाच्या हितासाठी जे चंदनासारखे झिजतात ते संत देव असतात.* त्यांची सेवा करा. त्यांचं पूजन करा. देव तुमच्या अंतर्यामी आहे. तुम्हीही देवच आहात. देवासारखे वागा. परउपकार करा. भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी द्या. हे जाणलं तर मग मन शांत होतं. भितीमुक्त होतं. प्रसन्न होतं. असं जगलं तर जीवन सफल होतं. जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्याला जगण्याचा असा साधा, सोपा मार्ग सांगतात. या मार्गाने जगण्याचा आटोकाट प्रयत्न करु आणि आपलं जीवन सफल करु. 
*जय जगद्गुरू !*
                   - उल्हास पाटील
                    *गाथा परिवार*
                    ९९७५६४१६७७

One thought on “५०. अभंग क्र. ११४
तीर्थीं धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ।।१।।मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ।।२।। तीर्थीं भाव फळे । येथें अनाड तें वळे ।।३।। तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ।।४।।

  1. तुकाराम महाराजां ची अंधश्रद्धा कर्मकांड विरोधक समाज सुधारक ही भूमिका आत्तापर्यंत कधीच नजरेसमोर आली नाही विठ्ठल विठ्ठल करणारा भोळाभाबडा टाळ कुट्या अशीच प्रतिमा जाणून बुजून लोकांच्या नजरेसमोर आणून ठेवली जात होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *