आईला फक्त लेकराच्या हिताचीच चिंता असते. कोणत्याही लाभाविण प्रित करणाऱ्या जातीचा आईचा कळवळा असतो. ती बाळाचा भार आपल्या पोटात वाहते, त्याचं सर्वकाही सहन करते. तुकाराम महाराज म्हणतात "संतजनहो, तसंच माझं तुमच्यावर ओझं आहे." तुकाराम महाराज संसारी संत होते. संसारातलं सुखदुःख, प्रेम, माया यांचा पुरेपूर अनुभव त्यांनी घेतला होता. ते संसार जगले होते. हा अनुभवच त्यांच्या अनेक अभंगातून शब्दरूप घेऊन प्रकट होतो. जे अनुभवलं तेच तुम्हाला देत असतो असं त्यांनी एका अभंगात म्हटलं आहे. आपल्या अनेक अभंगातून तुकाराम महाराजांनी मातेच्या प्रेमाचं वर्णन केलं आहे. आईच्या वात्सल्याचं वर्णन करतांना तुकाराम माऊलीच्याच ह्रदयाची कोवळीक व्यक्त होते. त्यांचे शब्द इतके अलवार होतात की त्यांच्या दर्शनानेच माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो. विव्हळ होतो. *आपल्या लेकरावर प्रेम करणं हा आईचा स्थायीभावच असतो. तो तिचा धर्मच असतो. प्रेम हा तिचा स्वभावच असतो. प्रेम ही तिची आंतरिक ओढ असते. "अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी", तसं तिचं आपल्या लेकरावरचं प्रेम आपोआप प्रकट होत असतं.* नऊ महिने ती आपल्या पोटात गर्भाचा भार वाहते, त्याचं सुखदुःख सर्व तिच सहन करते. जन्मल्यावरही त्याचं पोषण करते, त्याची काळजी वहाते. लेकराच्या सुखदुःखापुढे तिला स्वतःच्या सुखदुःखाची तमा नसते. स्वतःच्या जीवाचीही पर्वा नसते. *हे अपत्याप्रती प्रेम फक्त मानव जातीतच नाही तर बहुतेक सर्वच प्राण्यात आढळून येतं.* आपल्या पिल्लाचं रक्षण करतांना दुबळा प्राणीही कसा आक्रमक होतो आणि आपल्यापेक्षा प्रबळ शत्रूला पळवून लावतो ते आपण ब-याचदा अनुभवलेलं असतं. आपल्या अंड्यांचं रक्षण करतांना टिटवी समुद्राशी पंगा घेते आणि त्याला नमवते ही रुपककथा आपण वाचलेली असते. *तुकाराम महाराज शब्दप्रभू होते. त्यांचं शब्दसामर्थ्य अफाट होतं. त्यांची शब्दांची निवड तर इतकी अचूक की त्याजागी तोच शब्द फिट्ट बसतो, दुसऱ्या शब्दाची तिथे कल्पनाच करता येत नाही. कमीतकमी शब्दात अतिशय व्यापक, सखोल अर्थ व्यक्त करण्याची जगद्गुरू तुकाराम महाराजांची क्षमताही अचंबित करणारी आहे. शब्दातून विविध भाव प्रकट करण्याचं त्यांचं सामर्थ्यही कल्पनातीत आहे. कारण ही ट ला ट, री ला री लावून केलेली कविता नाही. ते अंतरीचे बोल आहेत.* म्हणूनच अन्यायाविरोधात वज्रासारखं कठोर होणारं त्याचं मन आईपण व्यक्त करताना कमालीचं हळूवार होऊन जातं. हे प्रेम, हे वात्सल्य, ही लेकारांप्रतीची समर्पणशीलता हा त्यांचा आत्मानुभव आहे. जशी छत्रपती शिवरायांसारख्या कल्याणकारी राजासाठी प्रजा ही पोटच्या मुलासारखी असते, तसंच संतांसाठी सर्व माणसं आपल्या अपत्यासारखीच असतात. *तुकाराम महाराजांचा जनसामान्यांप्रतीचा कळवळा मातेच्याच जातीचा आहे. लेकराचं अहित होताना पाहून कळवळणाऱ्या मातृह्र्दयाप्रमाणे तुकाराम महाराजांचं ह्रदय इथल्या सामान्य माणसाचं दु:ख, दैन्य पाहून , लूट आणि पिळवणूक पाहून कळवळत होतं. लेकराच्या रक्षणासाठी आई जशी उग्र रूप धारण करते तसेच तुकाराम महाराज कठोर होताना दिसतात. अशा अवस्थेत त्यांच्या तोंडून कठोर शब्द बाहेर पडतात. त्यासाठी ते प्रसंगी देवाशीही भांडायला उभे राहतात. आई लेकराला जीव तोडून समजावून सांगते, उपदेश करते, प्रसंगी कठोर शब्दात त्याची निर्भत्सना करून त्याला परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करते, वेळच आली तर त्याला शिक्षाही करते. या सर्वांमागे तिची एकच भावना असते ती म्हणजे आपल्या लेकराचं हित जपायचं.* तिच भावना तुकाराम महाराजांच्या अभंगातून दिसून येते. "बुडता हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनिया ।। तुकाराम महाराजांचा सर्व आटापिटा आहे. म्हणूनच ते जीवावर उदार झाले आहेत. "भीत नाही आता आपुल्या मी मरणा । दु:खी होता जना न.देखवे ।।" या निर्धाराने सामान्य जनांच्या हिताच्या आड येणाऱ्या व्यवस्थेविरोधात त्यांनी संघर्ष छेडला आहे. तो संघर्ष त्यांच्या काव्यातही प्रतिबिंबीत झाला आहे. तुकाराम महाराजांच्या काव्यात मातृप्रेमाच्या सर्व विलोभनीय छटा आपल्याला आढळून येतात. त्या अनिर्वचनीय आनंद देवून जातात. माता, शिक्षक आणि संत यांची एकरुपकता तुकाराम महाराजांनी अनेक अभंगातून मांडली आहे. *आईच्या मनात आपल्या लेकराप्रती जे भाव असतात, तेच भाव ख-या शिक्षकाच्या मनात आपल्या विद्यार्थ्यांप्रती असतात, तेच भाव ख-या संतांच्या मनात समाजाप्रती असतात.* तुकाराम महाराजांसारख्या काळाच्या पुढे असणाऱ्याला प्रस्थापितांचा विरोधच सहन करावा लागतो. *तत्कालिन राज्यसत्ता विदेशी शासकांच्या हातात होती तर धर्मसत्ता ब्राह्मणांच्या ताब्यात होती. तुकाराम महाराजांनी जो संघर्ष छेडला होता त्यात यापैकी कोणाचाही आधार तुकाराम महाराजांना मिळाला नाही, मिळणं शक्यच नव्हतं. आपलं प्रभुत्व नष्ट करु पहाणा-याला कोण पाठिंबा देईल ?* म्हणून तुकाराम महाराज संतांना म्हणतात, जसा लेकराचा सर्व भार आईवर असतो, तसा माझा सर्व भार तुमच्यावर आहे. तुम्ही मला आईसारखे सांभाळता, पदोपदी सावरता, माझी काळजी घेता, मला मार्ग दाखवता. मला भरकटू देत नाहीत. बाळ जसं सर्वार्थाने मातेवर विसंबून असतं तसा मी तुमच्यावर विसंबून आहे. तुकाराम महाराजांच्या काळात तुकाराम महाराजांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी संत दिसत नाही. जे स्वयंघोषित संत होते ते संतत्वाच्या कोणत्याही कसोटीवर उतरणारे नव्हते. त्यांचं संतत्व आभासी होतं. मग तुकाराम महाराज कोणत्या संतांवर आपला भार घालत आहेत ? तुकाराम महाराजांच्या इतर अभंगातून ज्या संतांचा उल्लेख आला आहे ते सर्व त्यांचे पूर्वसूरी आहेत. *तुकाराम महाराजांवर सर्वाधिक प्रभाव संतशिरोमणी नामदेव महाराजांचा आहे. "वर्ण अभिमाने कोण जाले पावन .." या अभंगात त्यांनी तुळाधार, गोरा कुंभार, रोहीदास, कबीर, लतिफ, मोमीन, सेना महाराज, कान्होपात्रा, दादू पिंजारी, चोखामेळा, बंका, जनाई अशा अनेक संतांचा उल्लेख केला आहे. संत ज्ञानदेवांची पालखी पंढरपूरला न्यायला सुरुवात तुकाराम महाराजांनी केली. याशिवायही अनेक संत होऊन गेले, ज्यांच्या विचारांचा वारसा तुकाराम महाराज पुढे चालवत होते. हा वारसा सशक्त आणि मजबूत करत होते. तुकाराम महाराजांचा पिंड या संतविचारावरच पोसलेला होता. याच विचाराने त्यांना आधार दिला, सामर्थ्य दिलं, आत्मबळ दिलं, जिद्द दिली, प्रेरणा दिली. तो संतविचार संतांचंच प्रतिरुप होतं. देह विनाश पावतो, पण विचार अविनाशी असतात. देह मरण पावतो पण विचार अमर असतात.* तुकाराम महाराज स्वतःविषयी बोलत असताना आपल्याला एक संदेश देत असतात. *जसा माझा भार मी या संतविचारावर टाकला आणि निर्धास्त झालो, तसा तुम्ही टाका. म्हणजे संतांचा विचार आचरणात आणा. तुमचं भलंच होईल. कारण भलं करणं हाच संतांचा स्थायीभाव आहे. त्यांच्यावर भार टाका आणि निर्धास्त व्हा. जे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केलं तेच आपणही करु. आपणही ठरवू, संतविचार आचरु !* *जय जगद्गुरू !* - उल्हास पाटील *गाथा परिवार* ९९७५६४१६७७
गाथा परिवार
सत्य असत्याशी मन केले! ग्वाही मानियेले नाही बहुमता !!

खूप छान
राम कृष्ण हरी