पाणीच स्वच्छ नसेल तर साबण काय करील? तसंच ज्याचं चित्त शुद्ध नाही त्याला बोध केला तरी त्याचा उपयोग नाही. झाडाला फळच लागत नसेल तर वसंतऋतु काय करील ? वांझेला लेकरं होत नाहीत त्याला तिचा पती काय करील? पुरुष नपुंसक असेल तर त्याला त्याची पत्नी काय करील ? प्राण निघून गेल्यावर शरीर व्यवहार करील काय ? तुकाराम महाराज म्हणतात पाण्याशिवाय पीक येणार नाही, येणार नाही हे जाणून घ्या. *कोणत्याही प्रश्नाचं, समस्येचं मूळ समजणं गरजेचं असतं. शरीराच्या कोणत्या तरी भागात दुखणं असतं. हे दुखणं कोणती तरी नस दुखावल्याने, ताणली गेल्याने सरकल्याने होतं. किती बाह्य उपचार केला तरी ती नस जोवर जागेवर बसत नाही तोवर ते दुखणं बरं होत नाही. निष्णात हाडवैद्य असतो त्याला त्या दुखण्यावरुन कोणती नस दुखावली आहे वा सरकली आहे ते बरोबर कळतं. आणि मग ती नस जागेवर आली की दुखणं आपोआप नाहिसं होतं. पण त्यासाठी ती नस बरोबर पकडता यावी लागते. जे शारीरिक दुखण्याचं तेच कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय दुखण्याच्या बाबतीत, समस्यांच्या बाबतीत खरं असतं. त्या दुखण्याची वा समस्येची नस समजली तर ते दुखणं बरं करणं, ती समस्या सोडवणं शक्य होतं.* एक शेर आहे. *"जिंदगीभर गालिब यहीं भूल करता रहा । धूल चेहेरे पे थी आइना साफ करता रहा।"* आरसा जसं असेल तसं दाखवतो. जर चेहेराच मलिन असेल तर त्याला आरसा काय कळणार ? आपला चेहरा धुळीने माखलेला आहे याचं भानच नसलेली व्यक्ती आरशात पहाताना चेहेऱ्यावरचे दाग पाहून आरस्यावरच धूळ जमलेली आहे असं समजून कितीही वेळा तो आरसा पुसत राहिली तरी त्यामुळे चेहेरा स्वच्छ दिसणारच नाही. त्यासाठी स्वतःच्या चेहेऱ्यावरची धूळच धुवून टाकावी लागेल. तुकाराम महाराज विविध उदाहरणं देऊन आपल्याला मूळ कारणाकडे लक्ष वेधण्याची गरज स्पष्ट करतात. आपण जाहिरात पहातो. मेरे कमीज से तेरी कमीज सफेद कैसे ? पुढे सांगितलं जातं, अमूक साबून की धुलाई, कपडा जगमगाएँ । *एखादा कपडा स्वच्छ धुण्यासाठी कुठलाही साबण, कितीही घासला पण ज्या पाण्यात धुतो ते पाणीच घाण असेल तर कपडा स्वच्छ कसा होईल ? पाण्याची घाण कपड्याला लागून कपडा अधिकच घाण होईल. तसंच माणसाचं चित्त शुद्ध नसेल तर त्याला कितीही चांगला, हितकर उपदेश केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. अशा व्यक्तीला समजावणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतल्यासारखं होतं. अशा व्यक्तीत सुधारणा होत नाही. बुडत्याचा पाय खोलात .. म्हणतात तसं या व्यक्तीचं अध:पतनच होत जातं आणि ती स्वतःच्या आत्मनाशाला कारण ठरते. चित्त किंवा मन कशाने मलिन होतं ? टोकाचा स्वार्थीपणा, व्यसनं, मनोविक्रूती, अति महत्वाकांक्षा, उथळपणा यामुळे मन मलिन होतं. काम, क्रोध, लोभ, दंभ, मद मत्सराने मन मलिन होतं. कुसंस्काराने मन मलिन होतं. संशयाने मन मलिन होतं. दुसऱ्याच्या प्रती ईर्षेने मन मलिन होतं. द्वेषाने मन मलिन होतं. अहंकाराने मन मलिन होतं. परस्त्री, परधनाच्या लोभाने मन मलिन होतं. निरंकुश सत्तेने मन मलिन होतं. या कशानेही पछाडलेलं मन मुक्तपणे विचार करु शकत नाही. मोकळेपणे विचार करु शकत नाही. त्यामुळे ते सद्सद्विवेक गमावून बसतं. एकदा विवेक संपला की अध:पतन टळत नाही.* बिभिषणाने रावणाला समजवण्याचा प्रयत्न केला. सीतेला सोडून दे म्हणून सांगितलं, पण रावणावर त्याचा काही परिणाम झाला नाही. शेवटी चौदा चौकडीचं राज, पाताळाला गेलं. नष्ट झालं. सोन्याच्या लंकेचं दहन झालं. दुर्योधनाला समजवण्याचा विदुराने काय थोडा प्रयत्न केला ? श्रीकृष्णाने तर फक्त पाच गावांच्या बदल्यात तडजोड करण्याचाही प्रस्ताव दुर्योधनासमोर ठेवला होता. हस्तिनापूरच्या साम्राज्यासमोर पाच गावं म्हणजे सागरातल्या पाच घागरी ! पण हट्टाला पेटलेल्या दुर्योधनाने सुईच्या टोकावर बसेल इतकीही जमीन द्यायला नकार दिला. महायुद्ध अटळ झालं. प्रचंड नरसंहार झाला. अठरा अक्षौहणी सैन्याचा नाश झाला. पाच पांडव वगळता कौरव किंवा पांडवांच्या वंशालाही दिवा राहिला नाही. दुर्योधनाचं चित्त स्वार्थ, अहंकार, मत्सराने बरबटलं होतं. त्यापायी त्याने स्वतः सह सर्वांचा नाश ओढवून घेतला. *ज्याचं चित्त शुद्ध नसतं त्याच्यापर्यंत विवेकाचा आवाज पोहोचू शकत नाही. त्याला सदुपदेश रुचत नाही,* याची अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. *'गांधी' चित्रपट आठवा. गांधीजी फाळणी टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. अतिशय पोटतिडकीने जिन्हाला समजावत होते. पण जिन्हाच्या डोक्यावर फाळणीचं भूत सवार झालं होतं. जिन्हा आणि मुस्लिम लिग यांना साथ द्यायला सावरकर आणि हिंदू महासभा होती. त्यामुळे गांधीजींचे सर्व प्रयत्न अपयशी ठरुन शेवटी देशाची फाळणी अटळ झाली.* त्यानंतर झालेल्या दंगली, रक्तपात, खूनखराबा, अत्याचार, जाळपोळ यांनी गांधीजी म्हणत होते तेच बरोबर होतं हे सिद्ध झालं, पण मानवतेची जी हानी व्हायची ती होऊन गेली. *आपल्याविरुद्ध कपट कारस्थानं करणाऱ्या कारभा-यांना छत्रपती संभाजी महाराजांनी उदारपणे क्षमा केली होती. झालं गेलं विसरुन पुन्हा स्वराज्याच्या कामाला प्रामाणिकपणे लागा असा उपदेश केला होता. पण स्वार्थ, दंभ आणि अहंकाराने त्यांचं चित्त गढुळलं होतं ते गढुळलेलंच राहिलं. परिणामी त्यांची कारस्थानं सुरुच राहिली. आणि युगपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवरायांच्या या कारभा-यांच्या नशीबी हत्तीच्या पायी चिरडलं जाणं, तोफेच्या तोंडी जाणं, कडेलोट होणं आलं. त्यांच्या तोवरच्या सर्व कर्तृत्वाला काळोखी फासली गेली. इतिहासात त्यांचं नाव कायमचं काळ्या अक्षरात नोंदवलं गेलं. म्हणून तुकाराम महाराजांनी नेहेमीच चित्तशुद्धीचा आग्रह धरला आहे.* पुढच्या चरणात तुकाराम महाराज फळ न देणा-या व्रूक्षाचं, मूल होऊ न शकणाऱ्या स्त्रीचं आणि नपुंसक पुरुषाचं उदाहरण देतात. शारीरिक अक्षमता जर निसर्गतःच असेल तर केवळ त्यामुळे ती स्त्री वा त्या पुरुषाला न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांना मूल झालं नाही, म्हणून त्यांच्या माणूसपणात कोणतीही कमतरता नव्हती. वेणूताईना पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे झालेल्या गर्भपाताने गर्भाशयाला कायमची इजा झाली आणि त्यामुळे यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई यांना मूल होऊ शकलं नसलं तरी त्यामुळे त्यांनी जे अफाट कर्तृत्व गाजवलं त्याला कोणताही कमीपणा आला नाही. *शरीराच्या वांझपणापेक्षा बुद्धीचा वांझपणा, विचारांचा वांझपणा फार भयानक असतो. विनाशक असतो. यापायी माणसं चुकीच्या विचारांच्या मागे भरकटत जातात, चुकीच्या विचारांच्या, माणसांच्या, संघटनांच्या कच्छपी लागतात. स्वतःचा आणि समाजाचाही नाश ओढवून घेतात. हिटलरच्या नादी लागलेल्या जर्मनीला, मुसोलिनीच्या मागे लागलेल्या इटलीला, तालिबान्यांच्या नादी लागलेल्या अफगाणिस्तानला आणि पाकिस्तानला जो नाश पहावा लागला, लागतो तो बौद्धीक वांझपणामुळेच ! सनातन्यांच्या नादी लागून उद्या अशीच वेळ आपल्यावरही येऊ शकते. ती येऊ द्यायची नसेल तर बौद्धीक मांद्य दूर केलं पाहिजे. विवेकाची कास धरली पाहिजे. स्रूजनाच्या क्षमता जाग्या केल्या पाहिजेत. हिंसा, द्वेषावर आधारित पूर्वापार चालत आलेली विचार करण्याची पद्धत सोडून दिली पाहिजे.* *महात्मा गांधीजींनी शस्त्राशिवाय लढण्याचा नवा अभिनव मार्ग जगाला दिला. अमेरिकेतल्या काळ्या लोकांनी, दक्षिण आँफ्रिकेच्या भूमीपुत्रांनी, इतरही देशातल्या मानवसमूहांनी या मार्गाने आपलं स्वातंत्र्य, आपले हक्क मिळवले. याला स्रूजनशीलता म्हणतात. गांधीजींना विरोध करणारे जुनंच हिंसेचं तुणतुणं वाजवत बसले कारण त्यांची बुद्धी वांझ झाली होती. नवा विचार प्रसवायला वांझ ठरली होती. नवनिर्मितीला अक्षम होती.* ज्याप्रमाणे प्राण गेलेलं कलेवर कोणताही व्यवहार करायला अक्षम असतं तशी त्यांची गत झाली होती. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, "जीवनाविण पीक नाही". पीक वाढण्यासाठी पाण्याची गरज असते तशीच *राष्ट्राच्या उभारणीसाठी सद्विचार, ऐक्य, राष्ट्रभावना असली पाहिजे. समाज सुखी सम्रूद्ध व्हायचा असेल तर त्याच्या मूळाशी नीतीविचाराचं सिंचन आवश्यक असतं. मोगली अतिक्रमणापुढे आदिलशाही, कुतुबशाही पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. पण स्वराज्य २७ वर्षे झुंजून अजिंक्य राहिलं कारण स्वराज्याच्या मुळाशी शहाजी महाराज, जिजाऊ, शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी नीतीविचाराचं सिंचन केलं होतं. तुकाराम महाराज आपल्या साध्या शब्दांतून आणि उदाहरणातून असा व्यापक आशय व्यक्त करतात. म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या विचारांचं सिंचन केल्याशिवाय नवसमाज निर्मितीचं पीक येणार नाही हे ध्यानी घेऊ आणि हा विचार घराघरात सर्वदूर पसरवण्याचा संकल्प करु !* *जय जगद्गुरू !* - उल्हास पाटील *गाथा परिवार* 9975641677
गाथा परिवार
सत्य असत्याशी मन केले! ग्वाही मानियेले नाही बहुमता !!

ज्या गांधींचं उदाहरण देऊन तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाकीच्या क्रांतीकारकांना नावे ठेवत आहात त्यावरून तुमचं मन किती निर्मळ असेल याची कल्पना न केलेली बरी…आता एक करा…आताच्या गांधींच्या काँग्रेस ची स्थिती बघा आणि सावरकरांच्या विचाराने चाललेल्या भाजपची स्थिती बघा …
त्यामुळे तुम्ही जर वारकरी असाल तर निरपेक्षपणे लिहायला शिका फक्त ठराविक लोकांना खुश करण्यासाठी तरी जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या विश्व कल्याण सांगणाऱ्या सर्वव्यापी विचारांचा आधार घेऊ नका…
ll हरीओम ll
ll रामकृष्णहरी ll
जसं रावण आणि प्रभु श्री रामांच उदाहरण दिलं जातं त्या अर्थान घ्या म्हणजे तुमची समस्या दुर होईल..