पाटाच्या वा दंडाच्या पाण्यात एखादी काडी पडली तरी ती खूप पाणी वाया घालवते. त्याचप्रमाणे एका दुर्जनाच्या संगतीने अनेकांचा घात होतो. एक माशी पडली तरी पुष्कळ अन्न नासते. तुकाराम महाराज म्हणतात रांडेने अशा भांडखोराला
कशाला जन्म दिला.
इंग्रजीत असं म्हणतात की Men are born, but they are made. म्हणजे माणसं जन्माला येतात, पण माणूस घडवावा लागतो. माणूस कसा घडतो ? माणूस संस्काराने घडतो. संगतीने घडतो. लहान मूल कोरी पाटी असते. सुरुवातीला ते आईच्या संपर्कात असते, नंतर वडिल, भावंडं, आजी, आजोबा, काका, मामा, शेजारी, मित्रपरिवार असा परिघ विस्तारत जातो. मनासारख्या वा मनाविरुद्ध घडलेल्या घटनांना आई-वडिल कसा प्रतिसाद देतात, विशिष्ट प्रसंगी ते कसे वागतात ते लहान मूल पहात असतं. त्याचीच तेही नक्कल करत असतं. तसंच वागत असतं. हळूहळू तो त्याचा स्वभाव होऊन जातो. एखादं मूल रागीट असलं तर लोक म्हणतात हा त्याच्या बापाच्याच वळणावर गेला आहे. बाप रागीट, एककल्ली, स्वतःचाच विचार करणारा असेल, घरात हुकुमत गाजवत असेल, बायकोवर खेकसत असेल तर मुलही त्याचं अनुकरण करतं. आई कोपिष्ट असली, थोड्या थोड्या कारणाने चिडणारी, भांडणं करणारी असली तर तिचं पाहून मुल तसंच वागतं. म्हणून तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलं आहे, “मायबापें जरी सर्पिण बोका । त्यांच्यासवे सुखे न पवे बाळ।।” आईवडिलांनंतर सर्वाधिक प्रभाव शिक्षकाचा असतो. शिक्षक मुलांवर योग्य संस्कार करु शकतो. शिक्षकाचं काम आई-वडिलांपेक्षा जास्त कठीण असतं. कारण त्याला एकाचवेळी वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेल्या मुलांना हाताळायचं असतं, सांभाळायचं असतं. म्हणून शिक्षक बालमानसशास्त्राचा जाणकार असावा लागतो. कोणत्या विद्यार्थ्याला कसं हाताळायचं ते त्याला कळायला हवं. यासाठीच शिक्षणशास्त्राच्या अभ्यासक्रमात बालमानसशास्त्राचा समावेश केलेला आहे. पण परिक्षेत प्रश्नांची उत्तरं देण्यापलिकडे कोणी त्याचा गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. प्रत्यक्ष शिक्षक म्हणून काम करताना तर या ज्ञानाचा उपयोग कोणीच करत नाही. जो तो आपल्या स्वभावानुसार वर्तन करतो. या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज फार महत्त्वाचा संदेश देतात. “आत पडे काडी । तरी ते बहुत पाणी खोडी ।।” शेतात पिकाला पाणी देण्यासाठी पाट किंवा दंड किंवा लांघी असते. त्यात एखादी काडी जर पडली आणि कुठेतरी अडकली तर मागून येणाऱ्या काड्या वा घाण तिला अडकतात, हळूहळू ते वाढत जाऊन पाण्याच्या प्रवाहाला अडथळा करतात. पाणी फुगतं, आणि पाटाबाहेर, दंडाबाहेर ओसंडतं, वाया जातं. त्यामुळे पिकाला कमी पाणी मिळतं. नको तिथे चिखल होतो.
ही काडी म्हणजे आपल्या स्वभावातली खोड, दोष आहे. काडीमुळे जसं पाणी वाया जातं , नुकसान करतं, तसंच स्वभावातल्या खोडीमुळे, दोषामुळे आयुष्य वाया जातं. खोडी अनेक प्रकारच्या असतात. एखादी व्यक्ती चिडखोर, भांडखोर असते. तिचं कोणाशीच जमत नाही. तिला कोणी समजून सांगायचा प्रयत्न केला तरी ती कोणाचं ऐकत नाही. आपलाच हेका चालवते. तिच्या या स्वभावापायी तिचे स्वतःचे तर नुकसान होत असतेच, पण इतरांनाही त्रास होत असतो. काही व्यक्ती आळशी तर काही कामचुकार असतात. त्यांना कामाचा मोबदला भरपूर हवा असतो, पण कष्ट करण्याची तयारी नसते. काही न करता, वा थोडंसं काही करुन भरपूर मिळवणं हा त्या व्यक्तीला आपला हक्क वाटत असतो. अशी व्यक्ती नेहेमी काम टाळण्याचा प्रयत्न करते. काही व्यक्ती कारस्थानी स्वभावाच्या असतात. सतत कोणाविरुद्ध काहीतरी कारस्थान करणं यातच त्यांना धन्यता वाटते. त्या स्वतः तर काही करत नाहीतच पण जर कोणी चांगलं काम करत असेल तर त्यात त्या अडथळा आणतात. चांगल्या कामात विघ्न निर्माण करतात. काही व्यक्ती अहंकारी, हुकुमशाही प्रवृत्तीच्या असतात. मी म्हणेल तेच झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. हट्ट असतो. ते दुसऱ्याच्या मनाचा विचारच करत नाही. समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, त्याचं यावर काही म्हणणं आहे का ? त्याची काही बाजू आहे का त्याचा विचार न करता ‘हम करे सो कायदा ।’ अशाप्रकारे ते वागतात. काही फार धुर्त असतात. विंचवासारखे नांगी मारुन दूर होतात, आपण त्या गावचेच नाही असं दाखवतात. करुन सवरुन नामानिराळे राहतात. वेळ आल्यावर हात झटकून मोकळे होतात. काही व्यक्ती विश्वासघातकी असतात. स्वतःचा किरकोळ स्वार्थ साधण्यासाठी ते कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसायला कमी करत नाहीत. अशा माणसाबद्दल बोललं जातं, “हा सख्ख्या आईला होणार नाही, तर दुसऱ्याला काय होईल.” म्हणजे हा स्वतःच्या आईलाही धोका देऊ शकतो तो दुसऱ्या कोणाशी प्रामाणिक राहणार आहे ? या खोडींमुळे त्या व्यक्तीचं स्वतःचं तर नुकसान होतंच असतं, पण सभोवतालच्यांचही नुकसान होत असतं. काही व्यक्ती मूर्ख असतात. त्यांना काहीच कळत नसतं. पण आपल्याला सर्व काही कळतं असं त्यांना वाटत असतं. अशा खोडींमुळे जसं व्यक्तिगत नुकसान होतं तसंच अनेक संस्था, संघटना, पक्ष यामुळे मोडकळीस येतात. त्यांच्या कामाचं फार मोठं नुकसान होतं. जी ऊर्जा रचनात्मक कामात वापरली जायला हवी ती विध्वंसक कामात खर्च होते. अशा खोडींमुळे व्यक्तिगत पातळीवर जसं नुकसान होतं तसंच देशपातळीवरही होतं. जशा वाईट व्यक्ती असतात, तशाच वाईट संघटना असतात. त्या वाईट विचार पसरवतात. समाजात द्वेष फैलावतात. हिंसा फैलावतात. दुही निर्माण करतात. सामाजिक शांतता, सौहार्द नष्ट करतात. देशाच्या प्रगतीला खो घालतात. देश दुबळा करतात. देशाच्या विकासात अडसर निर्माण करतात. असे दोष काही राष्ट्रातही असतात, जे आंतरराष्ट्रीय शांतता, सलोखा, सौहार्द बिघडवून युद्धं लादतात. शेतातल्या पाटापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ही काडी विविध रुपं धारण करते. व्यक्तीगत जीवनापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत उत्पात घडवते. म्हणून ही काडी वेळीच काढून टाकणं गरजेचं असतं. जे या काडीकडे दुर्लक्ष करतात ते आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतात. जे वेळेवर जागे होत नाहीत, काडी/खोडी काढून टाकत नाहीत त्यांची अवस्था नंतर, *”अब पछतावे होत क्या हैं जब चिडियाँ चुँग गयी खेत”, अशी होते. “बैल गेला आणि झोपा केला”, मग डोकं आपटूनही काही होत नाही.
. १९४७ साली धर्माच्या आधारावर पाकिस्तान स्वतंत्र झाला. हिंसेचा अवलंब करुन स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानात सतत हिंसक मार्गाने हुकुमशाही राज्य करत राहिली. पूर्व पाकिस्तानी जनतेचा आक्रोश हिंसक मार्गाने दडपण्याचा प्रयत्न झाला. परिणामी पाकिस्तानचे तुकडे झाले. म्हणून वेळीच जागं होणं गरजेचं असतं. आज आपल्या देशातही हुकुमशाही प्रवृत्ती प्रबळ झाल्या आहेत. जनता वेळीच जागी झाली नाही तर भविष्य चांगलं असणार नाही.
पुढच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, “दुर्जनाचे संगती । बहुतांचे घातहोती ।।” मराठीत म्हण आहे “एक सडका आंबा पूर्ण आढी नासवतो”. एका दुर्जनाच्या संगतीत येणाऱ्या इतर अनेकांचं खूप नुकसान होतं.
आपल्याकडेच नाही तर जगभर धर्मांधता, द्वेष, हिंसा पसरवणा-या व्यक्ती आणि संघटना आहेत. त्या व्यक्ती वा संघटनेच्या संपर्कात जे येतात आणि राहतात ते हळूहळू त्याच विचारांचे होतात. त्यांचीही मनं द्वेषाने कलुषित होतात. त्यांच्या मनात हिंसा थैमान घालते. ते मानसिक समतोल, सद्सद्विवेक गमावतात. ते हिंसा करायला उद्युक्त होतात. मुंबई बाँम्बस्फोट असो की मालेगाव-परभणीचे बाँम्बस्फोट असो, ते करणा-यांचा धर्म वेगळा असेल, त्यांच्या झेंड्याचा रंग वेगळा असेल तरी त्या सर्वांची मानसिकता सारखीच असते. ते सारखेच मूर्ख आणि क्रूर असतात. वरवर ते विरोधी भासत असले तरी त्यांच्यात आंतरिक ऐक्य असतं. ते अतिरेकीच असतात. त्यांच्या संगतीत जे येतात, तेही अतिरेकी होतात. मग आपण महात्म्याचा खून करतो आहोत, समाजहितैषी विचारवंताला संपवत आहोत की निष्पाप लोकांचे बळी घेत आहोत याची त्यांना पर्वा नसते. ते स्वतःला सनातनी म्हणवतात, धर्मयोद्धे म्हणवतात वा जिहादी म्हणवतात. पण ते माथेफिरू आणि मानवतेला कलंक असतात. संत विचाराचे मारेकरी असतात. या अतिरेक्यांचा अंत शेवटी ठरलेलाच असतो.
ज्यांना पंतप्रधानांचे शरीररक्षक म्हणून मान मिळाला, ते अतिरेक्यांच्या संपर्कात आले. त्यांची डोकी फिरली. ते आपलं इमान विसरले. त्यांनी आपल्या पेशाशी गद्दारी केली. विश्वासघात केला. ते कर्तव्य विसरले. एका कर्तृत्ववान महिलेची हत्या केली. तेही गोळीबारात मेले. म्हणून संगत काळजीपूर्वक निवडली पाहिजे. विषाच्या संपर्काने पंचपक्वान्नंही विषारी होतात, तर चंदनाच्या संपर्कात येणारा सुगंधीत होतो.
आपलं म्हणणं समजावून देण्यासाठी तुकाराम महाराज आणखी एक उदाहरण देतात. ते म्हणतात,
एक पडे मासी ।
तरी ते बहु अन्न नासी ।।२।। पंचपक्वान्नं तयार केली आहेत. सुकामेवा घालून बासुंदी केली आहे. त्यात जर एक माशी पडली तर सर्व बासुंदी फेकून द्यावी लागते. सर्व बासुंदीचा नाश होतो.
अन्नपदार्थांच्या जागी कुटुंब ग्रूहीत धरलं, माशी म्हणजे एखादा कुटुंबाचा बिघडलेला सदस्य समजा. तो विक्रूत असेल, व्यसनी असेल, व्यभिचारी वा बाहेरख्याली असेल तर तो सर्व कुटुंबाच्या नाशाला कारणीभूत होतो. सत्वशील, स्वाभिमानी, चारित्र्यवान व्यक्ती अशा व्यक्तीबरोबर संसार करुच शकत नाही. ते कुटुंब मग मोडून पडतं. सगळेच समानधर्मा असतील तर मग वेगळी गोष्ट असते.
संस्थेत वा पक्षात हुकुमशाही प्रवृत्तीची, भ्रष्ट, अहंकारी, व्यभिचारी, कारस्थानी, दुष्ट प्रवृत्तीची व्यक्ती असेल तर ती चांगल्या माणसांना तिथे राहू देत नाही. मग त्या पक्षावर अनाथ होण्याची वेळ येते. वाईटावर अंकुश ठेवणारी चांगली माणसं दूर झाली की त्याच्यासारख्याच दुष्ट प्रवृत्तीची माणसं त्याच्याभोवती जमतात. आणि हळूहळू ती संस्था वा पक्ष यांचं अध:पतन होत जातं. वाताहात होते. म्हणून अशा माशा वेळीच हाकलून दिल्या पाहिजेत.
सुग्रास भोजन म्हणजे देशाची एकात्मता, देशाची अर्थव्यवस्था, देशातलं सौहार्द देशाची प्रगती, देशाचा विकास असं ग्रूहीत धरलं तर त्यात पडणारी माशी कोणती ते सहज लक्षात येतं. कोणती माशी पडल्याने देशाची अर्थव्यवस्था गडगडली. कोणती माशी पडल्याने देशाची एकात्मता भंग पावली. कोणती माशी पडल्याने देशाचा विकास खुंटला. कोणती माशी पडल्याने देशाची अधोगती झाली. कोणती माशी पडल्याने देशाची नासाडी झाली. हे आपण नीट विचार करुन समजून घ्यायला हवं.
बासुंदी वेळीच नीट झाकून ठेवली तर माशी पडणार नाही. हे झाकण म्हणजे आम जनतेची सद्सद्वविवेक बुद्धी ! ती शाबूत असेल, ती व्यवस्थित असेल तर माशी पडणार नाही. ती शाबूत ठेवण्यासाठी तुकाराम महाराजांचे अभंग वाचले पाहिजेत. मुळात अशा माशा होणारच नाहीत, वाढणारच नाहीत याची जर आधीच काळजी घेतली तर मग पुढचं नुकसान टळू शकतं.
आपल्या वैयक्तिक जीवनापासून सार्वजनिक जीवनापर्यंत नुकसान करणारी काडी कशी ओळखायची, सर्वनाश करणारी माशी कशी ओळखायची आणि होणारं नुकसान कसं टाळायचं ते जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांच्या विविध अभंगातून आपल्याला सांगतात. म्हणून हे अभंग वाचले पाहिजे. तुकाराम महाराजांच्या अभंगात जे शहाणपण ओतप्रोत भरलं आहे, ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवलं पाहिजे. हा खरा आपला सांस्कृतिक वारसा आहे. हेच खरं आपलं धन आहे. ते जपलं पाहिजे. यासाठी आपण सर्व निश्चितच प्रयत्न करु.
जय जगद्गुरू !
- उल्हास पाटील
गाथा परिवार
gathaparivar.org
9975641677
Khup Chan, samajala ashach samajsudharak Tukaram maharajanchya vicharanchi garaj ashe