जा, जा तू पंढरपूरला जा. हो, हो तू वारकरी हो.
हे चंद्रभागेचं वाळवंट सोडून वैकुंठाची इच्छा कशाला करतोस?
इथे प्रत्येकाच्या खांद्यावर वारकरी पताका आहे. गळ्यात तुळशीहार आहेत, कपाळी आबीर बुक्का लावलेला आहे.
इथे साधुसंतांची गर्दी झाली आहे, मी त्यांना लोटांगण घालत आहे.
जगद्गुरू तुकाराम महाराज प्रत्येकाला वारकरी होण्याचा आणि पंढरपूरला जाण्याचा आग्रह करत आहेत. जाय, जाय आणि होय, होय अशा शब्दांच्या द्विरुक्तीवरुन त्यांचा आग्रह स्पष्ट होतो. पंढरीलाच कशासाठी जायचं? कारण पंढरी हे भुवैकुंठ आहे म्हणून जायचं. पंढरी भुवैकुंठ का आहे? वैकुंठ म्हणजे विष्णुचा वास असलेली जागा. आईबापाच्या सेवेत मग्न असलेल्या भक्त पुंडलिकाचा विरह असह्य झाल्याने स्वतः पांडुरंग त्याच्या भेटीसाठी त्याच्या घरी गेला. पुंडलिकाची आई-बापाची सेवा पूर्ण झाली नव्हती. म्हणून त्याने विठ्ठलाकडे एक वीट फेकली. विटेवर उभा रहा म्हणाला. भक्तवेल्हाळ पांडुरंग दोन्ही हात कमरेवर ठेऊन पुंडलिकाची वाट पहात विटेवर उभा राहिला. अठ्ठावीस युगं झाली तो तिथेच उभा आहे. पंढरपूर हेच आता त्याचं निवासस्थान झालं आहे. म्हणून पंढरपूरला भूवैकुंठ म्हणतात. त्यामुळे पंढरपूरला गेल्यावर सलोकता, समीपता आपोआप लाभते. म्हणून नामदेव महाराज सांगतात की पंढरपूर हे सर्व तीर्थांचं तीर्थ आहे. जो पंढरपूरला नुसता वास करील, तिथे जाऊन राहिल, त्याची अनंतजन्माची पापं फिटून जातील. त्यासाठी त्याला दुसरं काही जपतप, व्रतवैकल्यं, विधी, दानधर्म वगैरे करण्याची गरज नाही. पंढरपूर ही पवित्र भूमी आहे. पावन भूमी आहे. म्हणून तुला जर हा भवसागर तरुन जायचा असेल तर तु पंढरपूरला जा. पांडुरंगाचं दर्शन घे. पांडुरंग हा राजस असा मदनाचा पुतळा आहे. त्याच्या दर्शनाने तुझं आयुष्य धन्य होईल. सफल होईल. तुकाराम महाराज नुसतं पंढरपूरला जा म्हणत नाहीत तर ते वारकरी हो असाही आग्रह धरतात. कारण पंढरपूरला कोणीही जाईल. तो वारकरी असेलच असं नाही. आणि संत सावता महाराजांसारखा तर जवळ असूनही तिथे जात नव्हते. कारण त्यांना कांदा, मुळा, भाजीतही विठाई दिसत होती. म्हणून तुकाराम महाराज आग्रह करतात की वारकरी हो. वारकरी व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं ?
वारकरी म्हणजे जो नियमित वारी करतो. वर्षातून दोन वेळा पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतो. चंद्रभागेत स्नान करतो. चंद्रभागा ही पापनाशिणी आहे. गंगा-जमुनासारख्या नद्या शुद्ध होण्यासाठी चंद्रभागेत स्नान करायला येतात असा चंद्रभागेचा महिमा सांगितला जातो. म्हणून तु वारकरी हो असं तुकाराम महाराज सांगतात. पण वारकरी होणं म्हणजे वर्षातून दोन वेळा पंढरपूरला जाणं, पांडुरंगाचं दर्शन घेणं आणि चंद्रभागेत बुडी मारणं इतकंच नाही. कपाळावर आबीरबुक्का लावला, गळ्यात तुळशीहार घातला आणि तोंडाने ज्ञानबा-तुकोबांचा जप केला, विठ्ठलाचा जप केला म्हणून कोणी वारकरी होत नाही. हे तर बाह्य सोंग झालं. हे तर निव्वळ कर्मकांडं झालं. जगद्गुरू तुकाराम महाराजांना असल्या कर्मकांडाचं अप्रूप वाटत नाही. त्यांच्यादृष्टीने वारकरी होणं म्हणजे वारकरी मूल्यं अंगी बाणवणं. कोणतं मूल्य? तर समतेचं मूल्य ! “अवघी एकाचि च वीण ।” या मूल्यावर विश्वास ठेवणं म्हणजे वारकरी असणं. संतशिरोमणी नामदेव महाराजांनी आपल्याभोवती ब्राह्मणांपासून ज्यांना अस्पृश्य समजलं जात होतं त्या चोखामेळ्यापर्यंतच्या अठरापगड जातीधर्मातल्या संतांची मांदियाळी जमवली. संन्याशाची मुले चांडाळ असतात असं ठरवून ज्यांना मुंजीचा अधिकार नाकारण्यात आला अशा अनाथ आणि गांजलेल्या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या भावडांना स्वतः भेटून नामदेवरायांनी त्यांना विठ्ठलाच्या चरणी आणलं. संत नामदेवांना पंढरपूरच्या मंदिरातून धक्के मारुन बाहेर काढल्यावर या सर्वांचा मेळा चंद्रभागेच्या वाळवंटात जमू लागला. “वर्णअभिमान जाला पावटणी । एक एका लागती पायी रे ।।वर्णअभिमान विसरली ज्ञाती । एक एका लोटांगणी जाती रे ।।” अशा शब्दात या महामेळाव्याचं, या समाजक्रांतीचं वर्णन खुद्द जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. म्हणून वारकरी होणं म्हणजे वर्णाभिमानाचा त्याग करणं, जातीच्या अभिमानाचा त्याग करणं, लिंग अभिमानाचा त्याग करणं, उच्चनीचतेच्या भावनेचा त्याग करणं, भेदाभेद मनातून काढून टाकणं म्हणजे वारकरी होणं. “मुंगी आणि राव । आम्हा सारखाच जीव ।।” अशी मनोधारणा निर्माण होणं म्हणजे वारकरी होणं. मनातून स्पृश्यास्पृश्यतेच्या भावनेचं पूर्णतः उच्चाटन होणं म्हणजे वारकरी होणं. हा हिंदू, तो मुसलमान, हा बौद्ध, तो शीख, हा जैन तो ख्रिश्चन अशा भेददृष्टीचा त्याग करणं म्हणजे वारकरी होणं. सर्व जग विष्णुमय आहे, भेदाभेद अमंगळ आहे असा दृढविश्वास म्हणजे वारकरी होणं. “सत्य असत्यासी मन ग्वाही ।” ठेवून चुकीच्या, अन्याय्य, अनैतिक, पाशवी बहुमतापुढे झुकायला नकार देणं म्हणजे वारकरी होणं. “पुण्य परउपकार पाप ते परपीडा” अशी ज्याची पापपुण्याची व्याख्या तो वारकरी असतो. जो सतरा देवांच्या मागे पळत नाही, पांडुरंगाला सोडून दुसऱ्या कोणाला भजत नाही, तो वारकरी असतो. जो परद्रव्य, परनारीचा विटाळ मानतो, जो उत्तम व्यवहार करुन धन कमावतो आणि उदास विचाराने खर्च करतो तो वारकरी असतो. असा वारकरी तु हो. तुझ्या मनातले भेदाभेद लयाला जाऊ दे. तुझ्या मनात सर्वांभूती समत्वाची भावना असू दे. कारण एकदा का अशी भावना निर्माण झाली की मग “देव जाले अवघे जण । माझे दोषगुण हरपलें ।।” अशी अवस्था प्राप्त होते. सर्वात ईश्वर आहे म्हणून कोणीही शत्रू नाही अशी निर्वेरता प्राप्त होते. यासाठी तु वारकरी हो असं तुकाराम महाराज सांगतात.
जगद्गुरू तुकाराम महाराज शब्द अतिशय काटेकोरपणे वापरतात. अघळपघळपणा त्यांच्या स्वभावातच नाही. तुकाराम महाराज उगाच शाब्दिक फुलोरे फुलवत नाहीत. आपलं म्हणणं मांडण्यासाठी ते एकदम चपखल शब्द निवडतात. त्या शब्दाच्या जागी दुसरा शब्द बसतच नाही. म्हणून त्यांच्या एकेका शब्दात इतका व्यापक अर्थ भरलेला असतो की त्यावर मोठमोठे प्रबंध व्हावेत. दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज विचारतात, “सांडोनियां वाळवंट । काय इच्छिसी वैकुंठ ।।” हे चंद्रभागेचं वाळवंट सोडून वैकुंठाची इच्छा कशासाठी बाळगतोस? या वाळवंटात कीर्तनं होतात. हरिकथा रंगतात. इथे भक्तीचा कल्लोळ उसळतो. स्वतः श्रीरंग या कीर्तनात दंग होवून नाचतो. याच वाळवंटात काला होतो. असा काला तर वैकुंठीही दुर्लभ आहे. इथे संतांची मांदियाळी जमते. असंख्य, अगणित भक्तांच्या रुपात इथे पांडुरंगच अवतरतो. या वाळवंटात जे येतात, त्यांचा क्रोध, अभिमान नष्ट होतो. वर्णाहंकार गळून पडतो. जातीभेद नष्ट होतं. प्रत्येक जण दुसऱ्यातल्या पांडुरंगाला नमस्कार करतो. स्त्री-पुरुष, ब्राह्मण-शूद्र, हिंदू-मुसलमान असल्या कोणत्याही भेदांना इथे थारा नाही. इथे कळिकाळालाही न भिणाऱ्या वैष्णववीरांचा महापूर लोटलेला असतो. त्यांच्या खांद्यावर वारकरी पताका, गळ्यात तुळशीहार आणि कपाळी आबीर गुलाल असतो. “खांद्या पताकांचे भार । तुळसीमाळा आणि अबीर ।।” असा त्यांचा साज असतो. डोळ्यात पांडुरंगाच्या दर्शनाची आस असते. टाळ-मृदुंगाच्या तालावर त्यांचं रोम रोम पांडुरंग होऊन जातं. कीर्तनातच त्यांची समाधी लागते. कीर्तनात ते पांडुरंगाशी एकरुप होऊन जातात. सायुज्जता पावतात.
पंढरपूरला जाण्याचा आणखी एक फायदा आहे. तिथे, साधुसंतांची दाटणी” होते. साधुसंतांचं दर्शन होतं. त्यांचा सहवास लाभतो. त्यांचा आशिर्वाद मिळतो. त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाचा लाभ होतो. साधुसंतांची संगत मिळते. आपलं जीवन उजळून जातं. त्यांच्या चरणावर डोकं ठेवता येतं. तुकाराम महाराजांनी अनेक अभंगातून संतांच्या चरणाची धूळ घेण्याची मनिषा व्यक्त केली आहे. इथे तर संतांची दाटणी होते. जिथे संत भेटतील तिथे, “तुका जाय लोटांगणी ।। तुकाराम महाराज त्यांना शिरसाष्टांग नमस्कार घालतात.
जगद्गुरू तुकाराम महाराज अनेक अभंगातून स्वर्ग नाकारतात, मुक्ती नाकारतात, वारकऱ्यांना प्रिय वैकुंठही नाकारतात. इतरांनाही वैकुंठाचा हव्यास धरु नका असं सांगतात. “बोले तैसा चाले” हे तुकाराम महाराजांचं ब्रीद आहे. इतरांनीही तसंच वागलं पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे. ते इतरांना जो उपदेश करतात तो स्वानुभवाच्या आधारे करतात. ते स्वतः तसं आचरण करतात. म्हणून त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त झालं आहे. वैकुंठाची लालसा धरु नका असं ते इतरांनाच सांगत नाहीत तर स्वतः तसं आचरण करतात. आम्हाला मुक्ती नको, आम्हाला पुन्हा, पुन्हा जन्म दे आणि तुझ्या चरणांची सेवा करण्याची संधी दे असं तुकाराम महाराज पांडुरंगाला आळवतात. त्यांचं वैकुंठ जर कुठे असलंच तर ते भुवैकुंठ पंढरपूर आहे हे विसरता येत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने वाळकरी व्हा. ज्या वारकऱ्यांनी सातशे वर्षांपूर्वी फुले-आंबेडकर यांच्या सुमारे पाचशे-सहाशे वर्ष आधी अस्पृश्यतेला तिलांजली दिली तो वारकरी धर्म किती पुरोगामी असेल? वर्णव्यवस्थेचे नियम मोडून, वर्णाभिमानाला तिलांजली देऊन, मनातल्या विटाळाच्या कल्पनांना मूठमाती देऊन, नुसते सहवासात राहणंच नाही तर काला करुन सहभोजन करणारे आमचे सर्व संत किती पुरोगामी आणि उदारमतवादी असतील. पण या रत्नांच्या खाणीत आज कोळशाची आणि गारगोट्यांचीच पैदास वाढली आहे. साने गुरुजींच्या उपोषणानंतर मंदिर सर्व जातींना खुलं झालं म्हणून प्रत्यक्ष विठ्ठलाच्या दर्शनावर बहिष्कार घालणारे साखरे महाराजांसारखे कीर्तनकार वारकरी धर्माविरुद्ध आचार करुनही वारकरी म्हणून मिरवतात. तिथले पुजारी मंदिर खुलं करण्यापूर्वी म्हणे तिथल्या विठ्ठल मूर्तीतलं तेज काढून घेतात आणि एका घागरीत भरुन ती दूर लपवून ठेवतात. आता या जातीयवाद्यांनी वेगळं विठ्ठल मंदिर बांधून ज्ञानबा-तुकोबांच्या विठ्ठलावरच्या बहिष्काराची पुढची पातळी गांठली आहे. कदाचित अजून काही वर्षांनी आपल्या परंपरेचा अभ्यास नसलेला भोळाभाबडा वारकरी इकडे गर्दी जास्त असते म्हणून तिकडच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन घरी जाईल. संतशिरोमणी नामदेव महाराज, माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरू तुकाराम महाराज यांची शिकवण पायदळी तुडवणारं नवं धार्मिक क्षेत्र पंढरपूरातच आपल्या विठ्ठलाच्या उरावर उभं राहिल. पुन्हा एखादा बडवा तीर्थकुंडात मुतून ते तीर्थ तिथे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या हातावर चमचा चमचा देईल. जे शोषणाचे अड्डे उध्वस्त करण्यासाठी संतांनी चारशे, पाचशे वर्षे संघर्ष केला तो वाया जाईल. नव्या विठ्ठल मंदिराच्या रुपाने नवा शोषणाचा अड्डा निर्माण होईल. संतसाहित्याचे अभ्यासक, जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वारस प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या तुकाराम दर्शन या बहुमोल ग्रंथात स्पष्ट शब्दात लिहिलं आहे की रामदास वारकरी परंपरेचा भाग नाही. रामदासाचे अभंग वारकरी म्हणत नाहीत. असं असताना खुद्द देहूच्या “गाथा मंदिरात” रामदासाचं केंद्र सुरु होतं, रामदासी कीर्तनपरंपरा रुजवणारी कीर्तन प्रशिक्षण शाळा सुरु होते, आणि तुकाराम महाराजांचा वारसा सांगत तुकाराम महाराजांच्या शिकवणूकीच्या विरुद्ध विचार रुजवण्याचं काम देहूतच सुरु होतं, तर आणखी काही वर्षात खुद्द तुकाराम महाराज देहूतून हद्दपार व्हायची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर देहूच्या घराघरातून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगाची पारायणं व्हायला हवीत. प्रत्येक मुलाच्या ओठावर तुकोबांचे अभंग खेळायला हवेत. देहूत तुकाराम महाराज आणि जिजाईंच्या नावाने शाळा आहेत. पण तिथल्या शाळेतल्या मुलांनाही तुकाराम महाराजांचे अभंग पाठ नाहीत ही दारुण अवस्था आहे. तुकाराम महाराज जीव तोडून सांगत आहेत, कळवळून सांगत आहेत, “होय होय वारकरी” आणि तुकोबांच्या जन्मभूमीतही जर त्यांचा विचार रुजत नसेल, तुकाराम महाराजांच्या वारसांनाही तुकाराम महाराजांच्या म्हणण्याचा अर्थ उलगडत नसेल तर ते दुर्दैवच म्हणायला हवं. ज्यांना तुकोबांच्या विचारांची चाड असेल त्यांनी तुकोबांचे विचार रुजवण्यासाठी धडपडत राहिलं पाहिजे.
जय जगद्गुरू !
- उल्हास पाटील
गाथा परिवार
gathaparivar.org
9975641677
🙏🙏🙏🙏🙏रामकृष्णहरी🙏🙏👏👏👏👏😊