गाथा परिवार

सत्य असत्याशी मन केले! ग्वाही मानियेले नाही बहुमता !!

photo

४३२. अभंग क्र. ४३२५ धन्या आतां काय करुं । माझें तान्हुलें लेकरुं ।।१।।धन्या अवचित मरण आलें । मज कोणासी निरविलें ।धृ।।माझें दार नका पाडूं । त्याचे हात पाय तोडूं ।।२।।एके हातीं धरली दाढी । घे कुऱ्हाडी दुजें हातीं ।।३।।येरी घाव घालूं पाहे । तंव तो उठोनि उभा राहे ।।४।।तुका म्हणे अवघीं चोरें ।सेखी रामनाम सोइरें ।।५।।


धनी मी आता काय करु? माझं लेकरु तान्हं आहे, नाहीतर मी तुमच्या सोबतच आले असते. धनी तुम्ही अवचित गेला, मला कोणावर सोपवून गेला? (असं म्हणून आक्रोश करणारीचा पती हातपाय ताठ फाकवलेल्या अवस्थेत मेला आहे. त्यामुळे प्रेत घराबाहेर नेता येत नाही. दरवाजा लहान आहे, पाडावा लागेल असं कोणीतरी म्हणतं, त्यावर ती म्हणते ) माझं दार तोडू नका, त्यापेक्षा त्याचे हातपाय तोडू. असं म्हणून एका हाताने दाढी धरली आणि दुसऱ्या हातात कुऱ्हाड घेतली. ती वेडी घाव घालणार तोच तो उठून उभा राहिला. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्व चोर आहेत, शेवटी रामनामच आपले खरे सोयरे आहे.”
जगद्गुरू तुकाराम महाराज हे जगातले सर्वोत्कृष्ट लघुकथालेखक आहेत. अनेक अभंगातून त्यांनी अशा छोट्या छोट्या प्रबोधनपर, बोधकथा सांगितल्या आहेत. मानवी उक्ती आणि कृतीतली विसंगती यातून उघड होते आणि एकाच वेळी माणूस खुदकन् हसतोही आणि गंभीर अंतर्मुखही होतो. आपण लैला-मजनू, हिर-रांझाच्या कथा ऐकलेल्या असतात. “हमें तुमसे प्यार हैं कितना ये हम नहीं जानते .. मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना ।” किंवा “शेर से मैं कहू तुम को छोडकर मुझे खा जाये”; अशी हिंदी गाणी ऐकायला चांगली असली तरी प्रत्यक्षात प्रत्येकाला आपलाच जीव आणि आपलाच स्वार्थ प्यारा असतो असा अनुभव आहे. “जन पळभर म्हणतील हाय हाय” ही जगरहाटी आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी दुसऱ्या अभंगात म्हटलं आहे,
जन हे सुखाचें दिल्या घेतल्याचें । अंत हे काळीचें नाहीं कोणी ।। झाल्या हीन शक्ति नाक डोळे गळती । सांडोनिया पळती रांडापोरे ।। बाईल म्हणे खर मरता तरी बरें । नासिले हे घर थुंकोनिया ।। तुका म्हणे माझीं नव्हतीच कोणी । तुज चक्रपाणी वांचूनियां ।। माणूस हा इतर प्राण्यांसारखा एक प्राणीच आहे. फार तर फार द्विपाद प्राणी ! दोन पायांचा प्राणी! पण माणूस प्राण्यांपेक्षा वेगळा झाला. त्याने संस्कृती निर्माण केली. इतर प्राण्यांपेक्षा वेगळी कुटुंबव्यवस्था निर्माण केली. जंगली प्राण्यात “बळी तो कान पिळी” हाच न्याय असतो. माणसाने दुबळ्यालासुद्धा सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था निर्माण केली. या व्यवस्थेत प्रत्येकाची प्रत्येक गरज भागवण्याची सोय केली. प्राण्यांमध्ये जो नर सर्वात बलवान असतो तो सर्व माद्यांवर अधिकार गाजवतो. दुबळ्या नराला हाकलून देतो. प्राण्यांमध्ये नातीगोती नसतात. माणसातही असे दोन पायाचे पशू असतात की ज्यांना नातीगोती कळत नाहीत. त्यांना फक्त भूक कळते. पोटाची आणि पोटाखालची भूक ! ती भागवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. ते कोणतेही सामाजिक नियम, नीती-अनिती वगैरे मानत नाहीत. पण असे काही अर्धमानव सोडले तर उर्वरित समाज काही नियमांनी बद्ध असतो. कुटुंब निर्माण झाली तेंव्हा त्यामागे कारणं होतीच. समाजाच्या गरजेतूनच कुटुंबव्यवस्था निर्माण झाली. त्यातून नातीगोती निर्माण झाली. वंशसातत्य टिकवण्याची आदीम प्रेरणा कुटुंब व्यवस्था निर्माण होण्याच्या मुळाशी होतीच. स्त्रीसत्ताक व्यवस्थेत स्त्री अनेक पुरुषांशी संबंध ठेवत असल्याने पुरुषाला आपला वंश पुढे जातो की नाही याबद्दल संशय वाटत होता. ते साहजिकच होतं. पुरुषसत्ताक व्यवस्थेत पातिव्रत्य कल्पना उदयाला आली, निर्माण करण्यात आली आणि रुजवण्यात आली त्यामागेही पुरुषाच्या मनातली आपल्या वंशसातत्याची उर्मी हेच प्रमुख कारण होतं. आजही पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरुन पत्नीच्या हत्येचे प्रकार घडताना दिसतात त्यामागे हिच भावना असते. एका कुटुंबातल्या सर्व व्यक्तिंचे हितसंबंध सारखे असतात असं मानलं जातं. या व्यक्ती एकदुसऱ्याशी प्रेमाच्या बंधनाने बांधले जातात. बांधले जावेत अशी अपेक्षा असते. तसं पुरुषाच्या बाजूने काही नाही. पण स्त्रीच्या बाजूने तिने आपल्या पतीवर प्रेम केलं पाहिजे, त्याचं हित जोपासलं पाहिजे असा एक दंडकच संस्कृतीने घालून दिला आहे. नुकतीच वटपौर्णिमा झाली. बायांनी वट पुजायचा, उपवास धरायचा, कशासाठी? तर जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून. खरोखरच नवरा चांगला असेल आणि असाच नवरा जन्मोजन्मी मिळावा असं तिला वाटत असेल तर गोष्ट वेगळी. पण तो दारुड्या असेल, व्यसनी असेल, रोज नियमितपणे तिला मारझोड करत असेल, शिवीगाळ करत असेल, त्याने तिला जीव पार नकोसा केला असेल तरीही वटपोर्णिमेला उपवास करुन तिने तोच जन्मोजन्मी मागावा यात प्रामाणिकपणा किती आणि सांस्कृतिक दडपणाचा भाग किती? आमच्याजवळ एक वडाचं झाड होतं. तिथे वटपोर्णिमेला जवळपासच्या स्त्रिया दोरा बांधायला यायच्या. आमच्या मित्राची बायकोही येऊन गेली. तेंव्हा त्याला म्हटलं हसत हसत आज तुला पक्का बांधला रे.. तर तो म्हणाला त्याच्यासाठी नाही ते. उलट आहे. म्हटलं कसं? तो म्हणाला पुढच्या जन्मी हा सोडून दुसरा कोणीही दे, याच्यासाठी एवढा खटाटोप चाललाय. विनोदाचा भाग सोडून दिला तरी खरोखरच किती बायांना जन्मोजन्मी हाच नवरा हवा असं वाटत असेल हा एक संशोधनाचाच विशेष आहे. पण एकंदरीत तुकाराम महाराज म्हणतात तसं वा एकूणच जगरहाटी पहाता, माणूस या जगात एकटा येतो आणि एकटाच जातो. तुकाराम महाराजांनी एका अभंगात लिहिलं आहे की,
सोईरे धाईरे दिल्या घेतल्याचे । अंत हे काळीचे नाही कोणी ।। सख्या गोत्रबहिणी सुखाचे संगती । मोकलुन देती अंत:काळी ।। आपुले शरीर आपुल्यासी पारिखे । परावी होतील नवल काई ।।तुका म्हणे आता सोड यांची आस । धरी रे कास पांडुरंग ।।
एकदा मरणाची वरात निघाली म्हणजे कोणी उंबरठ्यापर्यंत सोडायला येतं तर कोणी श्मशानापर्यंत सोडायला येतं. पण सोबत कोणीच येत नाही. पूर्वी काही लोकांत सतीची प्रथा होती. काही स्त्रिया संस्काराच्या प्रभावाने वा कुटुंबियांच्या दडपणाने सती जायला तयार होत. चितेवर बसतही. पण चहूबाजूंनी आग पेटल्यावर जीव वाचवण्यासाठी त्यांचा आक्रोश सुरु होई. तो कानावर पडू नये म्हणून मग मोठमोठ्याने ढोल, नगारे वाजवले जात. बंगालमध्ये सतीप्रथेचं प्रस्थ जास्त होतं कारण तिथे स्त्रीयांना पतीच्या मरणानंतर जायदाद, मिळकतीत वाटा मिळत असे. तो देण्यापेक्षा तिला सती जायला लावायचं म्हणजे ना रहेगा बास, न बजेगी बाँसुरी ! त्या सरणावर चढलेल्या स्त्रीला नशेचे पदार्थ दिले जायचे जेणे करुन तिला जिवंत जळताना आगीची धग जाणवू नये. आणि तरीही एखादी स्त्री जर त्या आगीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करु लागली तर काठ्यांनी ढोसून तिला आगीत ढकललं जाई आणि जिवंत जाळलं जाई. महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सकवारबाईसाहेब यांना नानासाहेब पेशव्याने त्यांच्या भावाच्या कानी लागून इच्छेविरुद्ध जिवंत जाळलं असा इतिहास आहे. सकवारबाईसाहेब या छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेला शोभेशा मुत्सद्दी होत्या. त्या जोपर्यंत जिवंत आहेत तोवर आपल्याला मनमानी करता येणार नाही म्हणून नानासाहेब पेशव्याने हे कारस्थान केलं असं सांगितलं जातं. गिरीश कुबेर ज्या पेशव्यांच्या कर्तृत्वाचे ढोल वाजवतो ते पेशवे किती नीच होते ते यावरुन दिसून येतं. पेशव्यांकडून वेगळं वागण्याची अपेक्षा करणंच चुकीचं होईल, पण सकवारबाईसाहेबांच्या भावाने त्यांना साथ द्यावी ? आपल्याच बहिणीला जिवंत जाळावं? राजकारणात कोणी कोणाचं नसतं हा तर जगाचा इतिहास आहे. उपकारकर्त्यांवरही लोक कसे उलटतात त्याची असंख्य उदाहरणं आहेत. कोणी काकाला मारुन सत्तामिळवतं, कोणी बापाला कैदेत टाकून सत्ता मिळवतं तर कोणी ज्याने संकटात हात दिला त्याचाच अडवाणी करतो. राजकीय, सामाजिक पातळीवरचं हे चित्र जेंव्हा कौटुंबिक पातळीवरही दिसतं तेंव्हा मात्र जगाचा मोह नष्ट होतो. जगणं निरर्थक वाटू लागतं. नातीगोती व्यर्थ वाटायला लागतात. एकटंपण अंगावर येतं. अशावेळी मग माणसानेच कल्पिलेला परमेश्वर हाच एकमेव आधार वाटू लागतो. त्याच्याशिवाय आपलं दुसरं कोणी नाही हाच विचार तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून मांडतात. तो वाचताना एकीकडे हसूही येतं आणि दुसरीकडे मन ही जगरहाटी पाहून विषण्णही होतं.
एक कुटुंब असतं. नवरा, बायको, एक तान्हं मुल असा संसार सुरु असतो. वटपोर्णिमा येते. बाई उपवास धरते. वड पूजते. नवरा विचारतो तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे? उद्या मी मेलो तर तु काय करशील? ती म्हणते तुम्ही मेल्यावर मी एक क्षणभरही जिवंत राहणार नाही. तुमच्याशिवाय या जगण्याला काहीही अर्थ नाही. तो विचारतो आणि आपल्या लेकराचं काय होईल? ती म्हणते, “जे व्हायचं ते होईल. ज्याने जन्म दिला तो देव पाहिल. मी मात्र तुमच्या माघारी जिवंत राहणार नाही.” एक दिवस असा येतो. स्त्रीचा पती मरुन पडला आहे. हातपाय अंगापासून दूर अशा अवस्थेत शरीर ताठलं आहे. ती विलाप करते आहे की माझा धनी गेला आता मी तरी जगून काय करु? मलाही जगायची इच्छा नाही. आता जगण्यासारखं माझ्याकडे काही राहिलं नाही. माझ्या आयुष्याला काही अर्थ उरला नाही. हात आपटते, डोकं झोडते, छाती पिटते आहे. आता ही नवऱ्याबरोबरच जाते की काय? असं लोकांना वाटू लागतं. पण ती म्हणते, धन्या माझं लेकरु तान्हं आहे.. त्याला सोडून मी तुझ्याबरोबर कशी येऊ? आपल्या लेकराकडे मग कोण पाहिल? त्याचं कसं होईल? म्हणजे नवऱ्याबरोबरच जायची इच्छा तर आहे पण तान्हं लेकरु सोडून कसं जायचं असाही पेच आहे. बाईची त्या दु:खात द्विधा मन:स्थिती झाली आहे, असं दिसतं. ती म्हणते,
धन्या आतां काय करुं । माझें तान्हुलें लेकरुं ।।१।।
इथपर्यंत समजण्यासारखं आहे. तिचं म्हणणं पटण्यासारखं आहे. पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्थेत पुरुष हाच घराचा मुख्य आधार समजला जात होता, आणि तसा तो होताही. स्त्रीचं जग ‘चूल आणि मूल’ या पलिकडे नव्हतं. स्त्रीयांना तसं शिक्षण नव्हतं, तशी संधी नव्हती आणि तसं सामाजिक वातावरणही नव्हतं. आणि हे फक्त आपल्याकडेच असं नव्हतं तर जगभर असंच होतं. युरोपात दोन महायुद्धं झालीत. मोठ्या प्रमाणात माणसं मारली गेली. सैन्यदलात मोठ्या प्रमाणात माणसांची गरज पडली. त्यामुळे इतर कारभारात पुरुष कमी पडू लागले. त्यामुळे मग स्त्रीयांना घराबाहेर पडायची संधी मिळाली. एकदा घराबाहेर पडलेल्या स्त्रियांनी नंतर युद्ध संपल्यावर पुन्हा घरी परतायला नकार दिला. त्यासाठी संघर्ष केला. सफ्रेजेट आंदोलन उभं राहिलं. स्त्रियांनी एक एक करुन आपले सर्व हक्क मिळवले. ही लाट मग जगभर पसरत गेली. पण ही खूप नंतरची गोष्ट होती. तुकाराम महाराजांच्या काळात स्त्री पूर्णपणे पुरुषावर अवलंबून होती. म्हणून ती स्त्री म्हणते,
“धन्या अवचित मरण आलें । मज कोणासी निरविलें ।।” तु तर अचानक गेलास. पण माझी काय व्यवस्था लावली? मला कोणाच्या भरवशावर सोडून गेलास? माझी जबाबदारी कोणावर सोपवली? मी एकटी बाईमाणूस आता काय करु? कशी जगू? आपल्या लेकराला कशी जगवू? मोठा झाल्यावर जर त्याने विचारलं माझा बाप कसा होता तर त्याला काय सांगू?
इथपर्यंत हा प्रसंग एका विशिष्ट पद्धतीने, पहाणाऱ्या, ऐकणाऱ्याला हेलावणारा आहे. पण अचानक त्यात एक नाटकीय वळण येतं. तिचा धनी हातपाय ताठरलेल्या अवस्थेत पडला आहे. तिचा आक्रोश सुरू आहे. बाकीचे लोक पुढच्या तयारीला लागले आहेत. ते प्रेत हातपाय शरीरापासून दूर अशा अवस्थेत ताठरल्यामुळे दरवाजातून बाहेर काढणं अशक्य झालं आहे. बाहेर काढणं तर भागच आहे. पण कसं काढायचं? प्रत्येक जण आपापल्या परीने डोकं लावतो आहे. कोणीतरी सुचवतो की घराचं दार पाडून टाकू म्हणजे ते बाहेर नेता येईल. ती स्त्री विलाप करत असली, तोंडाने रडत गागत असली तरी तिचं या सर्वांकडे बारीक लक्ष आहे. दार पाडायचं ऐकताच ती पुढे येते आणि म्हणते,
“माझें दार नका पाडूं । त्याचे हात पाय तोडूं ।।”
नको, नको. माझं दार पाडू नका. लोक विचारतात, “मग हे बाहेर कसं काढायचं. याला दुसरा मार्गच नाही. तेंव्हा ती म्हणते याचे हातपाय तोडून टाकू. मग त्याला बाहेर नेता येईल. ती नुसतं तसं म्हणत नाही तर कुऱ्हाड घेऊन येते. आणि मग “एके हातीं धरली दाढी । घे कुऱ्हाडी दुजें हातीं ।।” त्याची दाढी एका हातात धरली आहे, दुसऱ्या हातात कुऱ्हाड धरली आहे. तुकाराम महाराज लिहितात, “येरी घाव घालूं पाहे । तंव तो उठोनि उभा राहे ।।” ती हात तोडण्यासाठी कुऱ्हाडीचा घाव घालणार तोच पुन्हा कथेत एक नवं वळण येतं. तिचा नवरा चक्क उठून बसतो. त्याने फक्त मेल्याचं नाटक केलेलं असतं. त्याला बायकोच्या प्रेमाची परीक्षा पहायची असते. एव्हाना आपल्या बायकोचं आपल्यावर खरोखरच किती प्रेम आहे ते त्याला कळून चुकलेलं असतं. तो जिवंत आहे पाहून तिची तर वाचाच बसते. त्याला जीवनातलं वैयर्थ कळतं. अशी सर्व कथा सांगून शेवटी तुकाराम महाराज सांगतात,
“तुका म्हणे अवघीं चोरें ।सेखी रामनाम सोइरें ।।” नातीगोती, सखेसोयरे सर्व चोर आहेत, फक्त रामनाम आपले खरे सोयरे आहे. म्हणून त्याचीच कास धरा आणि विठ्ठल, विठ्ठल स्मरा.
जगद्गुरू तुकाराम महाराज वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या लोकांना उपदेश करतात. त्यामुळे त्यांच्या दोन अभंगात विसंगती आहे असं वाटू शकतं. तुकाराम महाराजांनी विविध नात्यागोत्यातले पदर अगदी हळुवारपणे, अलवार शब्दात उलगडून दाखवले आहेत. माय-लेकरातली माया वर्णन करताना तर तुकाराम महाराजांचे शब्द इतके तरल होतात की ते माणसाला मुळापासून हलवून सोडतात. सासरी जाणाऱ्या कन्येचं वर्णन असंच मन कातर करणारं, डोळ्यात पाणी आणणारं आहे. तुकाराम महाराजांचे थोरले बंधू अचानक घर कायमचे सोडून गेले होते. तुकाराम महाराजांना आयुष्यभर भावाचा वियोग डागण्या देत असावा. कारण त्यांनी अनेक अभंगातून अशाप्रकारे संन्यास घेऊन, घरदार सोडून जाण्याला तीव्र विरोध केला आहे. संसार नेटका करावा, आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्यात. संसार करत करत इतरांच्याही उपयोगी पडावं असंच तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. मग या अभंगात ते त्याच्या विरुद्ध पवित्रा का घेतात?
जो समाज फक्त स्वार्थाचाच विचार करतो, आपलं घर, आपलं कुटुंब, आपली बायकापोरं, आपला फायदा याचाच विचार जेंव्हा माणसं करतात तेंव्हा त्या समाजाचं पतन होतं. तो नष्ट होतो. गुलाम होतो. प्राचीन काळापासून स्वतःला समाजाचे कर्तेधर्ते म्हणवणाऱ्या, धर्मगुरु म्हणवणाऱ्या ब्राह्मणांनी फक्त आपल्या जातीच्या संकुचित स्वार्थाचा विचार करुन इतर सर्व समाजाला गुलाम केलं. त्या़ंच्यावर ज्ञानबंदी लादली, शस्त्रबंदी लादली, व्यवसाय बंदी लादली. सिंधुबंदी लादली. त्यांच्यावर अंधश्रद्धा थोपवल्या. परिणामी आपल्यावर मधून मधून काही काळाचा अपवाद वगळता सतत गुलामीच नशिबी आली. सर्व समाजाबरोबर ब्राह्मणही गुलाम होत होते. पण त्यांना त्याची फिकीर वाटत नव्हती. आपण परकीयांचे गुलाम झालो तरी बाकीचे आपले गुलाम आहेत, एवढ्यातच ते समाधान मानत होते. आजही भारतातला मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग अशाच मानसिकतेत जगतो आहे. “मी, बाल्या, बाल्याची आई आणि टू रुम किचन !” बस्स्.. या पलिकडे विचारच नाही. समाजात जातीयसंघर्ष वाढताहेत, वाढू द्या! धार्मिक तणाव वाढताहेत, वाढू द्या. माणसं करोडोंच्या संख्येने बेरोजगार होत आहेत, मी काय करु? मला मिळतं आहे ना वेळेवर सगळं? त्यांचं ते पाहून घेतील. देशाची अर्थव्यवस्था रसातळाला चालली आहे, मी काय करु? माझ्या हातात काय आहे? सरकारी कंपन्या विकल्या जात आहेत, जाऊ द्या! नाहीतरी सरकारी नोकर फार माजलेत. जिथे तिथे भ्रष्टाचार वाढतो आहे. काम कमी पण सतत आ वासलेले असतात. शिक्षण महाग होत चाललं, मी काय करु? ज्याला परवडेल त्याने घ्यावं! गरीबांसाठी सरकारी शाळा आहेतच. शेतकरी मरतो आहे, शेतकऱ्याला राबराब राबूनही भाव मिळत नाही, शेतकरी भिकेला लागला, पण त्याला मी काय करु? माझ्या हातात काय आहे? मला अन्नधान्य, भाजीपाला सर्व स्वस्त मिळालं पाहिजे. दारु महागाचीच पिईन पण दूध स्वस्तातच मिळालं पाहिजे, अशी या मध्यमवर्गीयांची मानसिकता झाली आहे. भावनिक, बौद्धिक पातळीवर एकप्रकारच्या बधीरपणाने सर्व समाजाला व्यापून टाकलं आहे. अशा लोकांना उद्देशून तुकाराम महाराज सांगतात की नुसतं माझी बायको, माझी पोरं माझं कुटुंब एवढ्याचाच विचार करु नको. फक्त “माझं कुटुंब, माझी जबाबदारी”, पुरेसं नाही. समाज हेसुद्धा एक व्यापक कुटुंबच आहे. त्याचाही विचार करा. त्याचीही जबाबदारी तुमच्यावर आहे. समाजाचे फक्त फायदे घेऊ नका. समाजासाठीही आयुष्याचा एक कप्पा राखून ठेवा. चारशे वर्षांनंतरही तुकाराम महाराजांचा उपदेश समाजासाठी किती गरजेचा आहे, तेच यातून दिसून येतं. तुकाराम महाराजांच्या अभंगातला ताजेपणा असा विलोभनीय आहे. कितीही काळ उलटला तरी तो यत्किंचितही कमी होत नाही. म्हणूनच हे अभंग नष्ट करण्याचे कितीतरी प्रयत्न झाले असले तरी काळावर मात करुन हे अभंग टिकून राहिले आहेत आणि राहतील. फक्त आपल्याला कालानुरूप या अभंगांचा अर्थ लावता यायला हवा.

जय जगद्गुरू !

जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अशा सुंदर अभंगांच्या निरुपणावर आधारित सुंदर ग्रंथ,
अभंगशतक १
“शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान”
किंमत : ₹ ४००/-
मिळण्यासाठी तसेच या सोबतच
जगद्गुरू तुकाराम महाराज जीवनसंघर्ष
₹ ५०/-
लोकराजा महाराजा सयाजीराव गायकवाड
₹ ६०/-
तिन्ही ग्रंथ एकत्रित घरपोच
मिळण्यासाठी
₹ ५००/-
(पोष्टेज खर्चासह)
गुगल पे क्र. 9975641677
उल्हास पाटील. (कोटक बँक वा एचडीएफसी बँक )
संपूर्ण पत्ता आणि पैसे भरल्याचा स्क्रीन शाँट
9420801956 या नंबरवर पाठवा.
– उल्हास पाटील
गाथा परिवार
9975641677

One thought on “४३२. अभंग क्र. ४३२५ धन्या आतां काय करुं । माझें तान्हुलें लेकरुं ।।१।।धन्या अवचित मरण आलें । मज कोणासी निरविलें ।धृ।।माझें दार नका पाडूं । त्याचे हात पाय तोडूं ।।२।।एके हातीं धरली दाढी । घे कुऱ्हाडी दुजें हातीं ।।३।।येरी घाव घालूं पाहे । तंव तो उठोनि उभा राहे ।।४।।तुका म्हणे अवघीं चोरें ।सेखी रामनाम सोइरें ।।५।।

  1. तपशील आणि सखोल विश्लेषणानंतर खूप छान वर्णन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *