शूरत्वाला म्हणजे शौर्याला मोल असतं, नुसते फिके म्हणजे पोकळ बोल काही कामाला येत नाहीत. एकदा जर लढण्याचं अवसान आणलं तर मग जीव गेला तरी माघारी फिरू नये. जो धैर्याने काम करतो त्याला नारायण सहाय्य करतो. तुकाराम महाराज म्हणतात, “हरि आपल्या दासाचं निर्धारपूर्वक रक्षण करतो.”
अनेक व्यक्तींना खूप बढाया मारायची सवय असते. जोवर प्रत्यक्ष लढायची वेळ येत नाही तोवर मी असं करील, मी तसं करील अशा बढाया मारल्या जातात. आपण फार शूर मुत्सद्दी असल्याचा आव आणला जातो. आपण सर्वज्ञानी असल्याचा आव आणला जातो. शब्दांचे फुगे फुगवले जातात. पण जेंव्हा प्रत्यक्ष लढायची वेळ येते तेंव्हा मात्र अशा व्यक्तीची भंबेरी उडते. ती व्यक्ती घाबरते. माघार घेते. पळून जाते. सपशेल लोटांगण घालते. सार्वजनिक जीवनातली काही प्रसिद्ध उदाहरणं आहेत. एक तर आपण सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. अण्णांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे हे पाहून एका बाबालाही आंदोलन करण्याची स्फूर्ती आली. वातावरण तापलंच आहे तर आपणही हात धुवून घ्यावा अशा विचाराने कदाचित त्याने आपले हजारो भक्त दिल्लीत जमवले. एरव्ही बाबा मोठमोठ्या गप्पा मारायचा. भ्रष्टाचाराविरोधात बोलायचा. महागाई विरोधात बोलायचा. भक्त भक्तच असतात. एकवेळ पाळलेला प्राणी तरी विचार करेल, पण भक्तांनी मेंदू जणू काढूनच ठेवलेला असतो. त्यामुळे ते कोणाच्याही मागे जातात, कशावरही विश्वास ठेवतात. गर्दी पाहून बाबाला मोठं स्फुरण चढलं. बाबा भीमदेवी थाटात भाषणं करत होता. सरकारवर घणाघाती टीका करत होता. पोलीस बाबाला पकडणार आणि आबाचा एन्काऊंटर करणार असं कोणी बाबाला सांगितलं कोणास ठावूक ? बाबा घाबरला. शिष्यीणींच्या घोळक्यात लपला. त्यांच्यातल्याच एकीचे कपडे अंगावर चढवून, तोंड लपवून, बायकांच्या घोळक्यात लपून पळून जायचा बेत उघडकीस आला. बायकी वस्त्रातल्या, बायकांच्या घोळक्यातल्या बाबाचा व्हिडीओ जगभर गेला. इतकं हसं जगात कोणाचंच झालं नसेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, “शूरत्वासी मोल l नये कामा फिके बोल ।l” व्यर्थ बडबडीचा काय उपयोग आहे? बढाया मारण्याचा काय उपयोग आहे? वेळ आल्यावर जर शेपूट घालणार असाल, मैदानातून पळ काढणार असाल, तर मैदानाबाहेर कितीही दंड थोपटले, मांड्या ठोकल्या तरी ते निरर्थक आहे. कोणाची ताकद किती? कोणामागे किती माणसं आहेत? या गोष्टी गौण असतात. माणूस खरोखर किती शूर आहे? त्याचं नीतिधैर्य किती उच्च आहे? हे महत्वाचं असतं.
महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषी धोरणाच्या विरोधात आंदोलन सुरु केलं होतं. काळ्या लोकांनाही माणसासारखं वागवलं जावं यासाठी गांधीजींनी संघर्ष सुरु केला होता. परिणामी सनातनी गोऱ्यांची माथी भडकली. सनातनी भारतातच असतात, हिंदू धर्मातच असतात असं नाही. सर्व धर्मात आणि जगात सर्वत्र असे सनातनी असतात. एकदा गांधीजी रस्त्याने एकटे चाललेले असताना काही सनातनी गुंडांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. गांधीजींना अपशब्द वापरणं, खडे फेकून मारणं, पाठलाग करणं सुरु होतं गांधीजी चालत राहिले. गोऱ्या गुंडांची गर्दी वाढत गेली. पण तरी गांधीजी घाबरले नाहीत. एका ठिकाणी तर त्यांना त्या गुंडांनी घेरलंच. पण एका विवेकी गोऱ्या स्त्रीने दर उघडून त्यांना पटकन आत घेतलं आणि दरवाजा लावून घेतला. मग पोलीस बोलवले आणि गांधीजींना त्यांनी सुखरूप तिथून बाहेर काढलं. गोडसेसारख्या दुष्ट सनातन्यांनी गांधीजींची हत्या करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण तरीही गांधीजी निर्भीडपणे फिरत राहिले. फाळणीच्या काळात, माथी भडकलेली असताना, भयानक क्रौर्याचा नंगानाच सुरु असताना गांधीजी पूर्व पाकिस्तानातल्या नौखाली परिसरात, जीवाची पर्वा न करता, एकटेच फिरत होते. तिथल्या दंगलग्रस्त हिंदूंना धीर देत होते. मुसलमानांच्या मनातला विवेक जागा करून दंगली शमवत होते. गांधीजी जिथे जिथे फिरले तिथल्या दंगली त्यांनी थांबवल्या. गांधीजींचं नीतिधैर्य असं उच्च प्रतीचं होतं. गांधीजी कधी बढाया मारत नव्हते. लोकांना पेटवत नव्हते. भडकाऊ भाषणं वा लिखाण करत नव्हते. पण हाती घेतलेल्या कार्यासाठी, आपल्या जीवनमुल्यांसाठी गांधीजी शेवटपर्यंत निर्भयपणे झगडत राहिले. याच काळात पंडित जवाहरलाल नेहरू हेसुद्धा दंगा सुरु असताना, जीवाची पर्वा न करता जमावात घुसून दंगेखोरांना शांत करत होते. दंगे शमवत होते.
याउलट, दुसरं उदाहरण गांधीजींच्याच समकालीन सावरकरांच आहे. सावरकर सिद्धहस्त लेखक होते. त्यांच्या लेखणीत आग लावायची ताकद होती. त्यांचं लेखन वाचून सामान्य व्यक्तीसुद्धा पेटून उठेल असं स्फोटक लिखाण सावरकरांचं आहे. त्यांनी इंग्लडमधून काही पिस्तुलं भारतात पाठवली. त्यातल्या एकाचा वापर करून त्यांच्या एका अनुयायाने एका इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला. तपासात ते पिस्तुल सावरकरांनी पाठवलं होतं हे सिद्ध झालं. सावरकरांना अटक झाली. त्यांना दोन काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. असं म्हणतात की शिक्षा सुनावल्यावर पण तितके वर्षे इंग्रजांच ब्राज्य तरी टिकेल का असे बाणेदार उद्गार सावरकरांनी काढले. इथपर्यंत सर्व ठीक होतं. पण अंदमानला जाताच सावरकरांची कधी पातळ झाली. त्यांचा धीर सुटला आणि महिन्याभरातच त्यांनी इंग्रज सरकारकडे पहिलं माफीपत्र पाठवलं. त्यानंतर सात माफिपत्रे पाठवली. त्यात आपल्या हातून भावनेच्या भरत चूक झाल्याचं मान्य केलं. त्याबद्दल क्षमायाचना केली. चुकलेला मुलगा परत आपल्या पित्याकडे जाणार नाही तर कोणाकडे जाणार अशा शब्दात इंग्रजांचं पितृत्व मान्य केलं. भविष्यात अशी चूक न करण्याचा शब्द दिला. इंग्रजाना संपूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला. आणि आपली आणि आपल्या भावाची सुटका करून घेतली. इतकंच नाही तर इंग्रजांना दिलेला शब्द तंतोतंत पाळला. बेचाळीसच्या लढ्यात गांधीजींच्या आवाहनानुसार संख्य देशभक्तांनी इंग्रजी नोकऱ्यांवर लाथ मारली असताना सावरकरांनी आपल्या भक्तांना सरकारी नोकरीत शिरायला सांगितलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिद सेना उभारली असताना आणि त्या सेनेसह चलो दिल्लीचा आदेश देऊन ते भारताकडे वाटचाल करत असताना सावरकर पेन्शनच्या बदल्यात भारतीय तरुणांना इंग्रजांच्या सैन्यात भरती व्हायला सांगितलं. सावरकरांना मिळणारी पेन्शन ही त्यावेळी कलेक्टरला मिळणाऱ्या वेतनापेक्षा जास्त होती हे लक्षात घेतलं म्हणजे सावरकरांनी स्वातंत्र्य आंदोलनाशी किती मोठी गद्दारी केली होती ते लक्षात येतं. “रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले” म्हणायचं, इतरांना लढायला उद्ध्युक्त करायचं आणि रणाला तोंड फुटताच स्वत: गर्भगळीत होऊन, रण सोडून पळून जायचं, याला शौर्य म्हणत नाहीत. एरव्ही छप्पन इंची छातीचे कितीही ढोल पिटले तरी वेळ आल्यावर जर त्या छातीतली हवा फुस्स करून निघून जात असेल तर उपयोग काय? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, “शौर्या असे मोल l न ये कामा फिके बोल ll” अशा अवसानघातकीपणामुळे जगात नाचक्की होते. नावाला, कुळाला कायमचा बट्टा लागतो. बदनामी होते. हसं होतं.
हिंदीच्या पाठ्यपुस्तकात एक ‘दो बाँके’ नावाचा धडा होता. दोन पहेलवान आमने सामने येतात. एकमेकांना ललकारतात. आव्हान देतात. दंड थोपटतात. मोठमोठ्याने गर्जना करतात. दोघांच्या मागे मोठी गर्दी जमा होते. त्यांचं दंड थोपटणं, आव्हान-प्रतिआव्हान, मिशांना पीळ देणं, त्यांचा तो अविर्भाव पाहून गर्दीला वाटतं की आता हे एकमेकांना भिडणार आणि आपल्याला चांगली लढत पहायला मिळणार. पण हे सगळं झाल्यावर दोघं समोरासमोर आल्यावर एक पहेलवान विचारतो की झगडा किस बात का हैं ? दुसरा म्हणतो की यहीं सवाल मेरे सामने हैं l मग पहिला म्हणतो, पूल के इस आधे हिस्से का मालिक मैं l दुसरा म्हणतो पूल के इस हिस्से का मालिक मैं l फिर क्या ? झगडा खतम ! परत दोघं आपापल्या दिशेला गर्वाने मान वर करून निघून जातात. चांगली लढत पहायला मिळेल म्हणून जमलेल्या गर्दीची मात्र घोर निराशा होते.
अभंगाच्या पुढच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, “केला न संडी कैवाड l जीवेंसाटी तों हे होड ।l” एकदा अवसान आणलं ना मग जीवाची बाजी लावायची. माघार घ्यायची नाही. शरण जायचं नाही. माफी मागायची नाही. पळायचं नाही. धीर सोडायचा नाही. कारण जीव हा आज ना उद्या जाणारच आहे. कोणीच अमरपट्टा घेऊन आलेला नाही. युद्धात मेला तर तुकाराम महाराज म्हणतात, “तुका म्हणे रणीं l मरता लाभ दुणी ll” रणात जो लढता लढता मरतो त्याला दुप्पट लाभ मिळतो. जो पळून जात नाही, धीर धरतो, त्याला नारायण साह्य करतो, म्हणजे तो यशस्वी होतो, त्याला विजय मिळतो. तो रण जिंकतो. त्याची कीर्ती होते. त्याचे पोवाडे गायले जातात. “धीर तो कारण l साह्य होतो नारायण ।l” तुकाराम महाराज काय म्हणतात ते नीट समजून घेतलं पाहिजे. जो धीर धरतो त्याला देव मदत करतो. जो घाबरून पळून जातो त्याला नाही. जो प्रयत्न करेल, जो चिकाटीने लढेल, जो हिम्मत हारणार नाही, जो जीवाची पर्वा करणार नाही त्याला देव मदत करतो. तोच पराक्रम गाजवतो. त्याच्या पदरी यश पडतं. त्याची कीर्ती होते. तो नवा इतिहास घडवतो. त्याचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं जातं. म्हणून एकदा अवसान आणलं तर मग जीवाची पर्वा ण करता लढायचं असं तुकाराम महाराज सांगतात.
शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, “तुका म्हणे हरि l दासां रक्षितो निर्धारी ll” हरी आपल्या भक्तांचं निश्चितच रक्षण करतो असा दिलासा तुकाराम महाराज शेवटच्या चरणातून देतात. पुराणातल्या अनेक कथा असं सांगतात की संकट समयी देव धावून येतो. भक्त प्रल्हाद, द्रोपदी वस्त्रहरण, अजामिळ, मगरीने पाय तोंडात पकडलेला गजेंद्र हत्ती अशा अनेक कथा आहेत. वास्तवात असं कुठं घडल्याचं दिसत नसलं तरी देव आपला पाठीराखा आहे हा विचार सामान्य माणसाला धीर देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनात अनेक प्रसंगी केवळ शौर्य आणि धैर्य या बळावर विजय प्राप्त केला आहे. म्हणून संकट प्रसंगी माणसाने धीर सोडू नये. तर तो आपलं स्वत:चं रक्षण करू शकतो हा बोध आपण यापासून घेतला पाहिजे. या अभंगात पाइक शब्द वापरलेला नसला तरी सर्वसामान्य माणसाइतकाच हा अभंग पाईकाला म्हणजे सैनिकालासुद्धा तितकाच उपयोगी आहे. शेतकरी असो वा कामगार असो, व्यापारी असो की आणखी कोणी. जीवन ही एक लढाई आहे असं म्हणतात. त्यामुळे जीवन जगणाऱ्या प्रत्येकाला हा अभंग उपयुक्त आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगांची कालातिकता यावरून लक्षात येते. हे अभंग आजही किती उपयुक्त आणि महत्वाचे आहेत ते लक्षात येतं.
जय जगद्गुरू !
“न सरे ऐसें दान l ज्ञानदान ”
“शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान” (किंमत : ₹ ४००/-); जगद्गुरू तुकाराम महाराज जीवनसंघर्ष ( ₹ ५०/-) आणि लोकराजा महाराजा सयाजीराव गायकवाड ( ₹ ६०/-) ही तिन्ही पुस्तके एकत्र रु. ५००/- त घरपोच मिळतील. यासाठी गुगल पे क्र. 9975641677 (उल्हास पाटील, कोटक बँक वा एचडीएफसी बँक ) संपूर्ण पत्ता आणि पैसे भरल्याचा स्क्रीन शाँट
9420801956 या नंबरवर पाठवा.
– उल्हास पाटील
गाथा परिवार
gathaparivar.org
9975641677
खुप छान तुम्हचे विचार खुपचं स्पष्ट आणि स्वच्छ आहेत आणि त्यांचा प्रत्यय भावार्थ मध्ये जाणवतो